अहमदाबाद मध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने गाजवला. या सामन्यात त्याने ९६ धावांची महत्त्वपुर्ण खेळी करत, भारतीय संघाला १६० धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघाने हा सामना १ डाव आणि २५ धावांनी जिंकला. तसेच ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली. यानंतर सुंदरचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील सुंदरवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचे मुख्य फलंदाज लवकर गारद झाले होते. त्यावेळी खालच्या फळीत फलंदाजीला येऊन सुंदरने, रिषभ पंतसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. त्यांनतर अक्षर पटेलसोबत मिळून सामना पुढे नेला. त्यामुळे ९६ धावा करत नाबाद राहिलेल्या सुंदरवर शास्त्रींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच सुंदर आपल्यापेक्षा उत्तम फलंदाज असल्याचे विधान देखील केले आहे.
रवी शास्त्री यांनी सुंदरचे केले कौतुक
जेव्हा रवी शास्त्री यांना विचारण्यात आले की, तुम्हाला वॉशिंग्टन सुंदरमध्ये तुमची सावली दिसते का? यावर रवी शास्त्री उत्तर देत म्हणाले, “तो माझ्यापेक्षा उत्तम खेळाडू आहे. त्याच्यात क्षमता आहे आणि तो खूप पुढे जाऊ शकतो. जर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये (कसोटी क्रिकेट मध्ये) सुधारणा केली; तर भारतीय संघाला परदेशात खेळण्यासाठी ६ व्या क्रमांकाचा खेळाडू मिळू शकतो. जो ५०, ६०, ७० धावा करून देईल आणि २० षटक गोलंदाजी करून २, ३ गडी देखील बाद करून देईल. मी खेळत असताना, परदेशात मला हेच करावे लागत होते. मला वाटते की वॉशिंग्टन सुंदर हे काम सहजरित्या करू शकतो.”
रवी शास्त्री यांनी सुंदरला दिला सल्ला
तसेच त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये तामिळनाडू संघाकडून सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत ते तमिळनाडू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि निवड समितीच्या सदस्यांसोबत देखील चर्चा करतील असे त्यांनी सांगितले आहे. तसेच शास्त्रींच्या मते, सुंदरने चेन्नईमध्ये खेळलेल्या ८५ धावांच्या खेळीपेक्षा अहमदाबाद कसोटीमध्ये खेळलेली ९६ धावांची खेळी महत्त्वपूर्ण होती. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वामिकाला भविष्यात आईसारखं मजबूत बनलेलं पाहायचंय; महिला दिनी कोहलीचा लेकीला खास संदेश
गुरुजींनी थेट आयसीसीवर साधला निशाणा; म्हणाले, “सतत नियमांमध्ये बदल करणे टाळा”