नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेला चौथा आणि अंतिम सामना भारतीय संघाने १ डाव आणि २५ धावांनी जिंकला आहे. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका ३-१ ने जिंकली आहे. यासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात त्यांच्यापुढे न्यूझीलंड संघाचे आव्हान असेल. अशातच चौथ्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसीवर निशाणा साधला आहे.
शास्त्रींनी आयसीसीवर साधला निशाणा
यापूर्वी आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याच्या नियमावलीत बदल केले होते. याबाबत शास्त्रींनी आयसीसीला सतत नियमात बदल करणे टाळायला हवे, असा सल्ला दिला आहे. भारतीय संघ अंतिम सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी स्पर्धेच्या क्रमवारीत सर्वाधिक गुण पटकावणारा संघ प्रथमस्थानी होता. परंतु आयसीसीने नियमात बदल केले होते. त्यानुसार गुणांच्या टक्केवारीनुसार क्रमवारी ठरवण्यात आली होती. यामुळे रवी शास्त्रींनी निराशा व्यक्त केली आहे.
पत्रकार परिषदेत जेव्हा रवी शास्त्री यांना विचारण्यात आले की, येणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तुम्हाला कुठले बदल अपेक्षित असतील त्यावर रवी शास्त्री म्हणाले, “आयसीसीने सतत नियमांमध्ये बदल करणे टाळले पाहिजे. मी कोविड-१९ मुळे ऑक्टोबरच्या महिन्यात घरी बसलो आहे आणि तेही इतर संघांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून कदाचित ३६० गुण. एक आठवड्यानंतर कुठलीही पूर्व कल्पना नसताना नियम लागू होतात की, आम्ही आता टक्केवारीनुसार पुढे जाणार आहोत. यामुळे आम्ही पहिल्या क्रमांकावरून सरळ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतो.”
अशी गाठली भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी
रवी शास्त्री यांनी म्हटले की, “आम्ही ६० ते ७० अंकांनी पुढे होतो आणि त्यानंतर आम्हाला सांगितले जाते की तुम्हाला काय करायचं आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करायचे आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यात अपयशी ठरलात, तर मायदेशात येऊन तुम्हाला इंग्लंड संघाला ४-० ने पराभूत करावे लागेल. याबरोबरच ५०० गुणांच्या जवळपास अंक मिळवावे लागतील. तरीही अंतिम फेरीत पोहोचण्याबाबत साशंकता होती. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप बारकाईने विचार केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.”
महत्त्वाच्या बातम्या-
भाग्यवंत विराट कोहली; क्रिकेटविश्वातील ‘हा’ मानाचा विक्रम करणारा एकमात्र खेळाडू
‘या’ खेळाडूंसाठी भारतीय कसोटी संघाची दारे होणार बंद? शुबमन गिलचाही समावेश