भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांची गणना क्रिकेटमधील दिग्गज कर्णधारांमध्ये होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठे विजय मिळवले आहेत. एकिकडे विराट सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे, तर धोनी आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकणारा कर्णधार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाची नेहमीच तुलना होत असते.
दरम्यान, या दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष खेळत असलेल्या रविंद्र जडेजाने त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
जडेजाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की ‘माझ्यासाठी दोघांची नेतृत्व शैली वेगवेगळी आहे. मला वाटते की धोनी भाई खूप शांत आहे, पण विराट जास्त आक्रमक आणि मैदानावर सकारात्मक कर्णधार आहे. त्या दोघांची संघाचे नेतृत्व करण्याची आपली-आपली पद्धत आहे.’
याबरोबरच जडेजाने हे देखील मान्य केले की त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीची कमी बऱ्याचदा जाणवते. धोनीने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
जडेजा म्हणाला, ‘हो, नक्कीच मला धोनीची कमी जाणवते, कारण तो मला नेहमी योग्य दिशेने मार्गदर्शन करायचा. जर मैदानात मी काही योग्य गोष्टी करत नसलो, तर तो माझ्याशी येऊन बोलायला आणि मला कोणत्या गोष्टीवर काम करावे लागेल, याबद्दल सांगायचा. तो माझ्याशी नेहमी बोलायचा आणि आमचा बाँड १२ वर्षांपासूनचा आहे, त्यामुळे मला त्याची कमी जाणवते.’
जडेजा धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाकडूनही खेळला आहे, तसेच तो आयपीएलमध्येही धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. त्याचबरोबर जडेजा सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून खेळतो. तर, यापूर्वी तो २००८ साली १९ वर्षांखालील विश्वचषकातही विराटच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
विराट-धोनी बाबत बोलायचे झाल्यास, त्यांच्यात मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. त्यातच आता हे आजी-माजी कर्णधार आगामी टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधार-मार्गदर्शक या भूमिकेत दिसणार आहेत. टी२० विश्वचषक २०२१ साठी धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर, विराट पहिल्यांदाच टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराटसोबत राजकारण होतेय”, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा खळबळजनक आरोप






