आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आश्चर्यकारक कामगिरी केली. आरसीबीनं सीएसकेचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफचं तिकिट मिळवलं. या ‘करो या मरो’ सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 201 धावा करायच्या होत्या. मात्र, बंगळुरूच्या गोलंदाजांनी धोनीच्या संघाला 191 धावांवरच रोखलं. या दणदणीत विजयानंतर आरसीबीचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
दिनेश कार्तिकनं बंगळुरूच्या विजयाचं श्रेय एसएस धोनीच्या एका षटकाराला दिलं. कार्तिक म्हणाला, “आज घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एमएस धोनीनं चेंडू मैदानाबाहेर मारला. त्यानंतर आम्हाला नवीन चेंडू मिळाला आणि आम्हाला गोलंदाजी करणं सोपं झालं.”
कार्तिकच्या या वक्तव्याचा अर्थ जर तुम्हाला समजला नसेल, तर आम्ही सांगतो. झालं असं की, सीएसकेला अखेरच्या षटकात प्लेऑफला क्वालिफाय करण्यासाठी 17 धावांची गरज होती. एमएस धोनी स्ट्राईकवर होता. त्यानं यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार लगावला. हा षटकार इतका मोठा होता की चेंडू सरळ स्टेडियमच्या बाहेरच गेला. यानंतर दुसरा चेंडू मागवण्यात आला.
खरंतर, धोनीनं ज्या चेंडूवर षटकार लगावला, तो चेंडू खूप ओला झाला होता. त्यामुळे गोलंदाजाला चेंडू हातात योग्यपणे पकडता येत नव्हता. आरसीबीच्या कर्णधारानं पंचांना विनंती करूनही चेंडू बदलण्यात आला नाही. मात्र धोनीनं मैदानाबाहेर चेंडू मारल्यामुळे यश दयालला नवा चेंडू मिळाला, जो की अजिबात ओला नव्हता.
मग काय, यानंतर दयालनं आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत महेंद्रसिंह धोनीला पुढच्याच चेंडूवर बाद केलं. यानंतर त्यानं शार्दुल ठाकूरला एक डॉट चेंडू टाकला आणि शेवटी जडेजाला दोन डॉट चेंडू टाकून त्यानं आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेलं. अशाप्रकारे, धोनीच्या षटकारामुळे आरसीबीचा फायदा झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीला घडवण्यात ‘या’ खेळाडूचा मोठा हात, सुनील गावसकर यांचं वक्तव्य
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का? हेड कोचच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण





