विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आजपासून बाद फेरीला (Knockout Round) सुरुवात झाली आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई आणि कर्नाटक यांच्यात लढत झाली. जिथे मजबूत वाटणाऱ्या मुंबईच्या संघाला VJD पद्धतीमुळे 55 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात युपी (UP) आणि सौराष्ट्र यांच्यात चुरस पाहायला मिळाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात सौराष्ट्र संघाने 17 धावांनी विजय मिळवला. यासह सौराष्ट्र आणि कर्नाटकने उपांत्य फेरीत (Semi-final) धडक मारली आहे.
कर्नाटकने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. शम्स मुलानीने 86 धावा केल्या, तर कर्णधार सिद्धेश लाडने 38 धावांचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईचा संघ 50 षटकांत 8 बाद 254 धावांपर्यंत मजल मारू शकला. बेंगळुरूसाठी (कर्नाटक) विद्याधर पाटीलने 3 विकेट्स घेतल्या, तर विध्वथ कवेरप्पा आणि अभिलाष शेट्टीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
मुंबईला या सामन्यात आपल्या स्टार खेळाडूंची उणीव भासली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकसाठी सलामीवीर देवदत्त पडिक्कलने नाबाद 81 धावांची खेळी केली. तसेच करुण नायरनेही नाबाद 74 धावा केल्या. पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना थांबवण्यात आला आणि अखेर VJD पद्धतीनुसार कर्नाटकने 55 धावांनी सामना जिंकला.
रिंकू सिंहच्या नेतृत्वाखाली सलग 7 सामने जिंकून युपीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युपीच्या संघाने 50 षटकांत 8 बाद 310 धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक गोस्वामीने 88 धावा केल्या, तर समीर रिझवीने नाबाद 88 धावांची भर घातली. रिंकू सिंह आज केवळ 13 धावाच करू शकला.
सौराष्ट्रसाठी चेतन सकारियाने 3 बळी घेतले. अंकुर पनवर आणि प्रेरक मांकड यांनीही प्रत्येकी 2-2 बळी मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा कर्णधार हार्विक देसाईने नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. प्रेरक मांकडने 67 तर चिराग जानीने महत्त्वाच्या 40 धावा केल्या. 40.1 षटकांत जेव्हा सौराष्ट्रची धावसंख्या 3 बाद 238 होती, तेव्हा पावसाने पुन्हा व्यत्यय आणला. यामुळे VJD पद्धतीनुसार सौराष्ट्र संघाला 17 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.






