भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत हा सध्या संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून आल्यानंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. फलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या पंतच्या यष्टीरक्षणावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. यष्ट्यांमागे वारंवार चुका केल्याने त्याला टीकेचा धनी बनावे लागते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी देखील अशीच काही घटना घडली.
पंतने दवडली यष्टीचीत करण्याची संधी
चेन्नई कसोटीत तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा तळाचा फलंदाज जॅक लिच फलंदाजी करत होता. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याला चकवत चेंडू वळविला. यादरम्यान लिच मोठा फटका खेळण्यासाठी पुढे आला होता. त्यावेळी पंतला त्याला यष्टीचीत करण्याची सोपी संधी मिळाली. मात्र, तो चेंडू व्यवस्थित पकडू न शकल्याने लिचला जीवदान मिळाले. पंतच्या या खराब यष्टीरक्षणामुळे अश्विन कमालीचा हताश झाला व त्याने डोक्याला हात लावला. काही वेळाने इंग्लंडचा डाव संपुष्टात आल्यानंतर अश्विन ड्रेसिंग रूमकडे जाताना या विषयावर पंतसोबत बोलताना दिसला.
श्रीधर यांनी केले होते पंतचे कौतुक
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी पंतचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते, “पंत हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. एक प्रतिभावंत खेळाडू ते दिग्गज खेळाडू बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच दिसते. तो माझ्यासाठी प्रत्येक संघात असेल. त्याच्या यष्टीरक्षणात सुधारणेला खूप वाव आहे. तो कठोर मेहनत देखील घेतोय. आगामी काळात त्याच्या यष्टीरक्षणामध्ये नक्कीच प्रगती दिसेल.”
भारताने गुंडाळला इंग्लंडचा डाव
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावांवर असलेला इंग्लंडचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ५७८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ६ बाद २५७ धावा काढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय
दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय






