कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पूर्ण झाली असून आता १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिकेला (T20I Series) सुरुवात होणार आहे. ही मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
विराट-रोहितमध्ये रंगणार शर्यत
या मालिकेत खेळताना विराट आणि रोहित दोघांनाही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs in T20I) करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे.
सध्या भारतीय टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ११९ सामन्यांत ३३.३० च्या सरासरीने ३१९७ धावा जमा आहेत. तसेच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९५ सामन्यांत ५२.०४ च्या सरासरीने ३२२७ धावा आहेत. त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर सध्या न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टील (Martin Guptill) आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत आत्तापर्यंत ११२ सामन्यांत ३२९९ धावा केल्या आहेत. या यादीत गप्टीलला मागे टाकण्याची संधी विराट आणि रोहित यांच्याकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान असणार आहे. गप्टीलला मागे टाकण्यासाठी विराटला ७३ धावांची आणि रोहितला १०३ धावांची गरज आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहित यांच्यात असलेल्या या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.
अशी होणार आहे टी२० मालिका
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात होत असलेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर १८ आणि २० फेब्रुवारीला या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना पार पडेल. या तिन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लाईव्ह ऑक्शनमध्ये चारू शर्मांकडून झालेली ही चूक तुमच्याही निदर्शनात आली नसेल, पाहा व्हिडिओ