न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यानंतर भारत आणि जागतिक कसोटी चँपियनशीपचा विजेता न्यूझीलंड संघांमध्ये २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारी २ सामन्यांची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.
या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने मान्य केले आहे की, भारतातच भारतीय संघाचा सामना करणे हे विरोधी संघांसाठी सर्वात मोठ्या आव्हानाप्रमाणे असते. यावेळी बोलताना त्याने कसोटी मालिकेत भारतीय फिरकीपटू आर अश्विनविरुद्ध न्यूझीलंडने बनवलेल्या योजनेचा खुलासा करण्यास त्याने नकार दिला आहे.
टेलर म्हणाला की, “निश्चितपणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान असेल. परंतु मी यासाठी पूर्णपणे तयार आहे. माझ्या मते, भारताविरुद्ध त्यांच्याच मायदेशात खेळणे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परदेशी मैदानावर खेळणे, यांपेक्षा कठीण आव्हान अजून कोणतेही नसते. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यापुढे ही २ सर्वात मोठी आव्हाने आहेत. परंतु एका संघाच्या रुपात आम्ही यासाठी सज्ज आहोत आणि आम्हाला माहिती आहे की, आम्ही अंडरडॉग आहोत. परंतु आम्ही नेहमीच चांगले प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असतो.”
“जेव्हाही तुम्ही भारतीय मैदानांवर भारतीय संघाचा सामना करता; तेव्हा तुम्ही नेहमीच अंडरडॉग असता. मग तुम्ही क्रिकेटविश्वातील अव्वल संघ असाल, तरीही तुम्हाला डावपेच आखूनच त्यांच्याशी दोन हात करावे लागतात,” असेही तो म्हणाला.
याखेरीज भारताचे मातब्बर अष्टपैलू आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्याविरुद्धही न्यूझीलंडचा संघ विशेष रणनितीसह उतरणार आहे. याविषयी बोलताना टेलर म्हणाला की, “मी सध्या आमच्या रणनितीचा खुलासा करू इच्छित नाही. मला अजून माहिती नाही की, कसोटी मालिकेत भारतीय संघ कोणत्या खेळाडूंना खेळवेल. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.”
“जर भारतीय संघाने ३ किंवा २ फिरकीपटू उतरवले, तर निश्चितपणे यामध्ये अश्विनचा समावेश असेल. तो खूप चांगला गोलंदाज आहे. खासकरुन भारतीय परिस्थितींमध्ये तो अजून चांगले प्रदर्शन करतो. त्यामुळे आम्ही कशाप्रकारे त्याच्या गोलंदाजीवर खेळू, यावर आमच्या संघाची भूमिका स्पष्ट होईल,” असे तो पुढे म्हणाला.
तसेच शेवटी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलताना न्यूझीलंडचा फलंदाज म्हणाला की, “नवा चेंडू असेल किंवा चेंडू रिव्हर्स स्विंग होत असेल; तर भारताचे वेगवान गोलंदाज धोकादायक ठरू शकतात. परंतु इथे नेहमीच फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु वेगवान गोलंदाजांनाही कमी समजून चालणार नाही.”