इंडियन प्रीमियर लीगचा पहिलाच आठवडा अटीतटीच्या सामन्यांनी भरलेला राहिला. बुधवारी (१४ एप्रिल) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा नायक ठरलेल्या शाहबाज अहमदने सामना झाल्यानंतर आपल्या कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनतर फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला १४३ धावा करता आल्या आणि सामना बेंगलोर संघाने ६ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात शाहबाज अहमदने २ षटक गोलंदाजी करत ७ धावा दिल्या. यासोबतच त्याने ३ महत्वाचे गडी देखील बाद केले.
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “१७ व्या षटकात गोलंदाजी करताना परिस्थिती खूप कठीण होती. परंतु मला आनंद आहे की, कर्णधाराने माझ्यावर विश्वास दाखवला. खेळपट्टीवरून मदत मिळत होती. याचा मी पुरेपूर फायदा उचलला. मला दुसऱ्या षटकात गोलंदाजी करताना विश्वास होता. परंतु मोहम्मद सिराज देखील चांगली गोलंदाजी करत होता आणि तो गोलंदाजी करण्यासाठी पात्र होता. तसेच माझ्यासाठी जॉनी बेअरस्टोचा झेल खूप महत्वपूर्ण होता. मला आनंद आहे की, मला आणखी एक सामना खेळायची संधी मिळाली.”
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडीक्कल लवकर माघारी परतला, तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत ५९ धावांची खेळी केली. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २० षटक अखेर ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. बेंगलोरच्या १५० धावांचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा संघनायक डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५४ धावा केल्या. तर मनीष पांडेने ३८ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोला अवघ्या १२ धावा करता आल्या. अशाप्रकारे बेंगलोरने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर करत आयपीएल २०२१ स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
शानदार विजयानंतर कॅप्टन कोहलीच्या आनंदावर विरजण, ‘त्या’ असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी फटकारले