इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता खेळला जाईल. या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स व ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येतील. मात्र, हंगामाचा उत्तरार्ध जेव्हापासून युएई येथे सुरू झाला आहे. तेव्हापासून ऋतुराज गायकवाडने हंगाम आपल्या नावे केला आहे.
युएईत सबकुछ ऋतुराज
आयपीएलचा चौदावा हंगाम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये स्पर्धेचा उत्तरार्ध सुरु झाला. मात्र, जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हापासून या मैदानांवर केवळ चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेच राज्य केले आहे.
ऋतुराजने शारजा, अबुधाबी व दुबई येथील मैदानांवर असा काही कारनामा केला जो ‘न भूतो न भविष्यती’ ठरला. त्याने या मैदानांवर सर्वाधिक ९६ निर्धाव चेंडू खेळले आहेत. तसेच, सर्वाधिक ११८ एकेरी धावा काढल्या असून, १८ दुहेरी धावा काढणारा देखील तो एकमेव फलंदाज आहे. त्याने या दरम्यान दोन वेळा तिहेरी धावा काढल्या आहेत. यामध्ये तो ईशान किशन व जेसन रॉय यांच्याबरोबरीत असून, त्याने या मैदानांवर ३६ चौकार व १७ षटकार ठोकलेत. अशी कामगिरी इतर कोणताही फलंदाज करू शकला नाही.
ऑरेंज कॅप पटकावण्याचा दावेदार आहे ऋतुराज
ऋतुराज गायकवाड याने अंतिम सामन्यात २४ धावा केल्यास तो केएल राहुलला मागे सोडून ऑरेंज कॅप मिळवू शकतो. त्याने स्पर्धेत आतापर्यंत १५ सामने खेळताना ४ अर्धशतके व एका शतकाच्या जोरावर ६०४ धावा फटकावल्या आहेत. ऋतुराजने मागील हंगामाच्या अखेरच्या तीन सामन्यात तीन अर्धशतके झळकावून याच मैदानांवरून आयपीएलच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआर-सीएसकेची लढत पाहण्यासाठी चाहत्यांच्या संयमाचा तुटला बांध; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
केकेआरला अंतिम सामन्यात डोकेदुखी ठरणार चेन्नईचे ‘हे’ पाच ‘सुपर किंग्स’
‘अरे भावा रामनवमी नाही महानवमी,’ रिषभ पंत ‘असं’ ट्वीट केल्याने झाला ट्रोल






