भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज कोण? असे कोणी विचारले तर लहानमुलांपासून शंभर वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वजण एकच उत्तर देतील ते म्हणजे सचिन तेंडुलकर. दोन तपाच्या आपल्या कारकीर्दीत, सचिनने क्रिकेटप्रेमींना अनेक आनंदाचे क्षण दिले. शंभर आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला. भारताच्या विजयाची गॅरंटी म्हणून सचिनकडे पाहिले जायचे. सचिन आहे तोपर्यंत भारत सामना जिंकणार अशी खात्री सर्वांना असायची. मात्र, एक आकडा असा आहे; ज्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. तो आकडा म्हणजे सचिनने झळकावलेल्या १०० शतकांपैकी तब्बल २५ शतकांवेळी भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील ११ शतक हे कसोटीत तर १४ शतक एकदिवसीय सामन्यांतील आहेत. या १४ शतकांपैकी एका शतकाविषयी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. सचिनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट शतकांपैकी एक असलेले हे शतक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.
भारतीय संघाचा तारणहार सचिन तेंडुलकर
सन १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, सहा-सात वर्ष सचिन भारतीय संघाचा फलंदाजीतील एकटा शिलेदार वाटायचा. १९९५ नंतर परिस्थिती काहीशी बदलली. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजय जडेजा यांच्या येण्याने सचिनवरील दबाव कमी झाला होता. २००० नंतर भारतीय संघ पूर्णपणे बदलला. गांगुली-द्रविड सोबत युवराज, सेहवाग आणि धोनीच्या येण्याने भारतीय संघ परिपूर्ण बनला होता. सचिनला देखील दुखापतीतून सावरल्यानंतर, मुक्तपणे आपला नैसर्गिक खेळ दाखवायची संधी मिळत होती. चॅपल यांच्या विसरण्यासारख्या कार्यकाळानंतर कर्णधारपद एमएस धोनीच्या हाती गेले. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करू लागला होता.
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
ऑस्ट्रेलियाचा संघ २००९ च्या अखेरीस भारत दौऱ्यावर आला होता. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद मिळवून ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झालेला. सात सामन्यांची एकदिवसीय मालिका उभय संघांमध्ये खेळवली जाणार होती. दोन्ही संघात मोठे मोठे नामांकित खेळाडू असल्याने, मालिका चुरशीची होणार यात शंका नव्हती.
मालिकेला चुरशीत सुरुवात
वडोदरा येथील पहिलाच सामना कमालीचा रंगला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २८८ धावांपर्यंत मजल मारू शकला. आठव्या गड्यासाठी हरभजन सिंह आणि प्रवीण कुमारने ८४ धावांची भागीदारी करत सामना अटीतटीचा केलेला. मात्र, पीटर सिडलने हरभजनला बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात टाकला. नागपूर आणि दिल्ली येथील सामने जिंकत भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. दोन्ही सामन्यांचे नायक अनुक्रमे कर्णधार एमएस धोनी आणि युवराज सिंह हे राहिले. मोहाली वनडे जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेतील चुरस वाढवली. पाचव्या महत्त्वपूर्ण सामन्यात दोन्ही संघ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडणार होते.
हैदराबादमध्ये रंगले द्वंद आणि ऑस्ट्रेलियाने उभारला धावांचा डोंगर
दिवस-रात्र असा खेळवल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी शेन वॉटसन आणि आयपीएलमधून नावारूपाला आलेला शॉन मार्श हे दोघे सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. वॉटसन-मार्श जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमणाचे धोरण स्वीकारले. वॉटसन तर भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला होता. दोघांनी वेगाने धावा बनवत वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. अर्धशतकानंतर मार्श काहीच सांभाळून खेळू लागला; तर वॉटसनने अधिकच रौद्ररूप धारण केले. वॉटसन आपले शतक पूर्ण करणार; असे वाटत असताना, हरभजनने त्याला वैयक्तिक ९३ धावांवर बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या, कर्णधार रिकी पॉंटिंगने वॉटसनचा कित्ता गिरवत आक्रमण चालू ठेवले. तो ४५ धावा काढून प्रवीण कुमार गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यादरम्यान, शॉन मार्शने आपले पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. शतकानंतर तो फार काळ टिकला नाही आणि ११२ धावांवर तंबूत परतला. कॅमेरून व्हाइट आणि माइक हसी यांनी तुफान फटकेबाजी करत अखेरच्या सात षटकात ८० धावा काढून, ऑस्ट्रेलियाचा डाव ३५० पर्यंत पोहचवला.
भारताची दमदार सुरूवात
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताच्या किमान एका खेळाडूला काहीतरी चमत्कारिक खेळी खेळण्याची आवश्यकता होती आणि हे शिवधनुष्य पेलले, संघातील सर्वात अनुभवी सचिन तेंडुलकरने. सचिन-सेहवाग या कसलेल्या सलामी जोडीने पहिल्या चेंडूपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. बेन हिल्फेनहॉस आणि डग बोलिंजर यांच्या पहिल्याच स्पेलमध्ये त्यांनी ६० धावा काढल्या होत्या. नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हिल्फेनहॉसला षटकार मारण्याच्या नादात सेहवाग सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने ताबडतोड ३८ धावांची खेळी केली.
भारतीय डावाला लागली गळती
सेहवाग बाद झाला आणि भारताच्या डावाला गळती लागली. गौतम गंभीर, युवराज सिंह आणि कर्णधार एमएस धोनी दुहेरी आकडा न गाठताच माघारी परतले. यादरम्यान, सचिनने शांतचित्ताने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. चौथ्या गड्याच्या रूपात धोनी बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या १६२ अशी झालेली. भारताला विजयासाठी अजूनही १८९ धावा हव्या होत्या.
सचिनने दाखवली आपली फलंदाजीतील कला
सचिनची फलंदाजी पाहता असे वाटत होते की, सचिन वेगळ्या आणि इतर फलंदाज वेगळ्या खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. सेहवाग बाद झाला तेव्हा सचिन २३ धावांवर होता आणि धोनी बाद होईपर्यंत तो ९५ धावांवर पोचला होता. मधल्या काळात भारताच्या तीन फलंदाजांनी अवघ्या २३ धावांचे योगदान दिले होते. सचिनने ८१ चेंडूत आपले शतक पूर्ण करून, भारताच्या डावाला आकार दिलेला. सामना वाचवण्यासाठी भारताला एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. सचिनला साथ देण्यासाठी त्यावेळी फिनिशरची भूमिका निभावणारा सुरेश रैना मैदानात आला होता.
रैनाची स्फोटक खेळी
रैनाला आपल्या दुसऱ्याच चेंडूवर जीवदान मिळाले. जीवदानाचा फायदा उचलत रैनाने आपल्या आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन क्रिकेटप्रेमींना दाखवले. शेन वॉटसनला षटकार ठोकत त्याने सुरुवात केली. नॅथन हॅरित्झच्या चेंडूवर रिकी पॉंटिंगने सुद्धा एक झेल सोडला. आपला पहिला सामना खेळणाऱ्या क्लिंट मॅकेला मिडविकेटवरून षटकार ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर वॉटसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. रैनाने ५९ चेंडूवर ५९ धावा काढताना तीन चौकार आणि तीन षटकार खेचले. रैना आणि सचिनच्या १३७ धावांच्या भागीदारीने भारत सुस्थितीत आला होता.
पॉंटिंगचा जुगार आणि ऑस्ट्रेलियाचे सामन्यात पुनरागमन
रैना पाठोपाठ हरभजन देखील दोन चेंडूंनंतर बाद झाला. युवा रवींद्र जडेजाने वेगवान सुरुवात करत, तीन चौकार मारले. भारत सामन्यात आघाडीवर होता. भारताला विजयासाठी तीन षटकात १९ धावांची गरज होती. सचिन स्थिरावलेला आणि जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. सामन्यातील महत्त्वाचे ४८ वे षटक टाकण्याची जबाबदारी रिकी पॉंटिंगने फिरकीपटू नॅथन हॅरित्झला दिली. हॅरित्झने आपल्या चार षटकात ४० धावा दिल्या होत्या. हॅरित्झकडे चेंडू सोपवून, पॉंटिंगने एकप्रकारे जुगार खेळला होता.
हॅरित्झच्या पहिल्या चेंडूवर सचिन स्ट्राइकवर होता. हॅरित्झने चेंडूला जराशी उंची दिली आणि सचिनने स्वीप मारला. चेंडू वेगात जाऊन सरळ मॅकेच्या हाती विसावला. भारताला मोठा धक्का बसला होता. सचिनच्या कारकिर्दीतील एक दर्जेदार खेळी संपुष्टात आली होती. मात्र, भारताला विजयीरेषेपार घेऊन जाण्यात तो अपयशी ठरला होता. हैदराबादच्या त्या मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत, सचिनने १४१ चेंडूत १७५ धावा फटकावल्या. सचिनच्या या खेळीत १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
तळाच्या फलंदाजांची हाराकिरी
सचिनपाठोपाठ तीन चेंडूंनंतर जडेजाही बाद झाला आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. पुढील षटकात आशिष नेहराने माइक हसीच्या हाती झेल दिला. अखेरच्या षटकात तीन चेंडूंवर पाच धावांची गरज असताना, प्रवीण कुमार धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने तीन धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने सामना गमावला तरी, सामनावीर सचिन ठरला होता.
सचिनने पुन्हा एकदा, आपल्या महानतेचे प्रमाण देत अत्यंत अप्रतिम खेळी केलेली. सारे देशवासीय सचिनकडूनच सर्वाधिक अपेक्षा का ठेवतात? या प्रश्नाचे उत्तर या खेळाद्वारे सर्वांना मिळाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
‘या’ खेळाडूंमुळे इंग्लंडने जिंकला विश्वचषक, खुद्द कर्णधार बटलरने केला खुलासा
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी