सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी भारताकडून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या खेळाडूंनी आपले सुरुवातीचे दिवस असे काही गाजवले की, सर्वांना त्या खेळाडूंमध्ये भविष्यातील सितारे दिसू लागले होते. मात्र, या खेळाडूंपैकी अनेकांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि ते एकएक करून भारतीय संघाबाहेर गेले. हे खेळाडू भारतीय संघातून असे काही बाहेर झाले की, त्यांना पुनरागमन करणे अशक्य होऊन बसले. त्यांच्या कारकिर्दीची अखेर अगदी कमी कालावधीत झाली. ऋषिकेश कानिटकर, रतिंदर सोढी, अविष्कार साळवी, विजय दहिया हे असे काही खेळाडू होते; जे चांगल्या सुरुवातीनंतर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त मोठी करू शकले नाहीत. यापैकीच एक होता तामिळनाडूचा हेमांग बदानी. आपल्या चार वर्षाच्या छोट्याश्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत फक्त एका संस्मरणीय खेळीसाठी प्रसिद्ध झालेल्या बदानीच्या ‘त्या’ खेळीच्या आठवणींना आज आपण उजाळा देऊया.
मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर झाली भारतीय संघात एन्ट्री
बदानीची भारतीय संघामध्ये एन्ट्री झाली ती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, डाव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षक अशी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील ख्याती होती. मॅच फिक्सिंगच्या क्रिकेटला लाज आणणाऱ्या प्रकरणानंतर, भारतीय संघाची नव्याने बांधणी केली जात होती. बदानीने २००० साली बांगलादेशविरुद्ध आपले एकदिवसीय पदार्पण केले. अजय जडेजासारखीच काहीशी प्रतिभा असलेला बदानी सहाव्या-सातव्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून भारतीय संघात आपली जागा बनवण्यासाठी प्रयत्नशील होता. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही छोट्या छोट्या परंतु महत्त्वपूर्ण खेळ्या करून त्याने संघात आपली जागा बनवली. २००१ मध्ये त्याने आपले कसोटी पदार्पण देखील केले. मात्र, तो कसोटीत सपशेल अपयशी ठरला. एका वर्षात चार कसोटी खेळायला मिळूनही, तो अवघ्या ९७ नावा काढण्यात यशस्वी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरला तरी, एकदिवसीय संघाचा तो एक उपयोगी खेळाडू बनला होता.
ऐतिहासिक कसोटी मालिकेनंतरची ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका
सन २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा जगज्जेता संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऐतिहासिक ठरलेल्या कसोटी मालिकेत, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सलग १६ कसोटी विजयाचा विजयरथ रोखत; कसोटी मालिका आपल्या नावे केली होती. कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुद्धा चुरशीची होणार याची सर्वांना खात्री होती. आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्याची अपेक्षा होती. दुसरीकडे, कसोटीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया करणार होता.
पहिला सामना जिंकत भारताची आघाडी
एकदिवसीय मालिकेला बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरूवात झाली. पहिली फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार गांगुली अवघ्या ६ धावा काढून परतला. अनुभवी सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ३६ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. भारतीय डावाला खरा आकार दिला तो ‘लोकल बॉय’ राहुल द्रविडने. द्रविडने ८४ चेंडूंचा सामना करत ८० धावांची लाजवाब खेळी केली. मात्र, भारताच्या डावाचे खरे नायक होते दोन दिल्लीकर. एक म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि दुसरा म्हणजे यष्टीरक्षक विजय दहिया. सेहवागने ५४ चेंडूत ८ सणसणीत चौकार मारून ५८ धावा काढल्या होत्या. दहियाने आक्रमक फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर करत; अवघ्या ३९ चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी केली. भारताची धावसंख्या ५० षटकांनंतर ३१५ अशी मजबूत भासत होती.
भारताच्या ३१५ धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्यापासून उभाच राहू शकला नाही. मार्क वॉ आणि रिकी पॉंटिंग झटपट बाद झाले. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या मायकल बेवनने ४९ धावांची जबाबदारीपूर्ण खेळी केली. मात्र, त्यानंतर कर्णधार वॉ, गिलख्रिस्ट, डेमियन मार्टिन हे आपल्या नावाला साजेसा खेळ करू शकले नाहीत. सलामीवीर मॅथ्यू हेडन दुर्दैवी ठरला. त्याने सर्वाधिक ९९ धावा केल्या. भारताकडून जवागल श्रीनाथ आणि ‘सरप्राईज पॅकेज’ ठरलेल्या विरेंद्र सेहवागने प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारतीय संघाने ६० धावांनी सामना जिंकत; मालिकेत विजयी सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात भारताची अडखळत सुरुवात
कसोटी मालिकेनंतर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे; भारतीय संघाचे मनोबल चांगलेच उंचावले होते. मालिकेत दुसरा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ पुण्याचे नेहरू स्टेडियमवर उतरले. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकत; फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार गांगुली सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. दुसरा सलामीवीर सचिन तेंडुलकरने मात्र, आक्रमणाचे धोरण स्वीकारले. सचिन आज काहीतरी चमत्कार करणार असे वाटत असताना; वैयक्तिक ३२ धावांवर फ्लेमिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. संघाच्या ३७ धावांमध्ये सचिनचे ३२ धावांचे योगदान होते. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लक्ष्मणने जम बसण्यासाठी बराच वेळ घेतला. पहिल्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविडने दोन चौकार मारत, चांगली सुरुवात केली. मात्र, तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. द्रविड बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या १४.३ षटकात ६० होती. अनुभवी फलंदाज म्हणून सर्वांच्या अपेक्षा लक्ष्मणवर होत्या. कारण, यापुढे येणारे सर्व फलंदाज युवा आणि काहीसे बेभरवशी होते. या सर्वांनी या पूर्वी काही चांगल्या खेळ्या केल्या होत्या; परंतु, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नव्हता. या सर्व परिस्थितीत मैदानात उतरला डावखुरा हेमांग बदानी.
बदानी-लक्ष्मणची संयमी भागीदारी
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बदानीवर लक्ष्मणला साथ देण्याची जबाबदारी होती. पहिल्या काही षटकातच त्याने नेत्रदीपक फटके मारत; सर्वांना चिंतेतून बाहेर काढले. लक्ष्मण-बदानी जोडीने भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली. खराब चेंडूवर चौकार वसूल करत; दोघेही भारताचा डाव नेटाने पुढे नेत होते. बदानी मैदानाच्या चारही बाजूंना चेंडू व्यवस्थितरित्या टोलवत होता. दरम्यान, लक्ष्मणने आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी ९३ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र, संघाच्या १५३ धावा झाल्या असताना; लक्ष्मण स्टीव वॉच्या अचूक फेकीवर धावबाद होऊन पव्हेलियनकडे रवाना झाला. लक्ष्मणने ८६ चेंडूत ५१ धावांची संयमी खेळी केली. आपला पहिला सामना खेळत असलेल्या दिनेश मोंगियाचे पदार्पण निराशाजनक राहिले. तो फक्त दोन धावा काढून बाद झाला.
हेमांगी बदानीची ‘जिनीयस’ खेळी
मोंगिया बाद झाला तेव्हा भारताच्या ३६.१ षटकांत पाच बाद १५७ धावा झाल्या होत्या. भारताची धावसंख्या २२० च्या आसपास जाण्याची शक्यता होतघ. बदानीने अत्यंत परिपक्वतेने फलंदाजी करत; धावसंख्या वाढवली. बदानी वेगवान व फिरकी गोलंदाजांविरुद्ध ज्या पद्धतीने धावा करत होता; ते पाहून ऑस्ट्रेलिया संघात काहीशे भीतीचे वातावरण तयार झाले होते. बदानीने एकाएकी अत्यंत आक्रमक धोरण अवलंबले. मॅकग्रा, डेमियन फ्लेमिंग, ऍण्डी बिकेल यांचा तो अगदी सहजतेने सामना करत होता. मार्क वॉला डोक्यावरून मारलेला षटकार तर, डोळ्याचे पारणे फेडणारा होता. ९८ धावांवर खेळत असताना ४९ व्या षटकातील तिसरा चेंडू त्याने कव्हर्समध्ये ढकलत एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला. कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या; स्टीव वॉने थ्रो केला मात्र, तो यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. त्याच चेंडूवर दुसरी धाव घेत, बदानीने आपले पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. बदानीच्या या खेळीचे कौतुक भारतीय संघच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाच्या खडूस क्रिकेटपटूंनी देखील मनापासून केले. बदानी पुढील चेंडूवर लेहमनच्या हाती झेल देतो बाद झाला. भारतीय संघाचा २०० च्या आसपास गुंडाळला जाऊ शकणारा डाव; बदानीच्या त्या खेळीने २४८ पर्यंत पोहोचला होता.
मार्क वॉच्या तुफानी खेळीने सामना बनला एकतर्फी
भारताने दिलेल्या २४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्क वॉ व मॅथ्यू हेडन यांनी १४३ धावांची दमदार सलामी दिली. हेडन ५७ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला लेहमन अवघी एक धाव करू शकला. मार्क वॉने मायकल बेवनसह विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मार्क वॉने १३३ धावांची धुवांधार खेळी करून सामना एकतर्फी बनवून टाकला. आपल्या शानदार शतकासाठी मार्क वॉ सामनावीर म्हणून निवडला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्याने मालिका बरोबरीत आली होती. पुढील तीन पैकी दोन सामने जिंकत; ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका आपल्या नावे केली.
भारताला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला तरी; हेमांग बदानीच्या खेळीचे खूप कौतुक झाले. अनेकांनी त्याला ‘जिनीयस’ अशी उपाधी दिली. मात्र, दुर्दैवाने तो पुन्हा अशी खेळी करू शकला नाही. सौरव गांगुलीने त्याला अनेक संधी दिल्या. २००४ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला. पुढे, मॅचफिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव आले. मात्र, त्यात तो निर्दोष सिद्ध झाला. बंडखोर इंडियन क्रिकेट लीगमध्ये त्याने चेन्नई सुपरस्टार संघाचे प्रतिनिधित्व केले. आयसीएलमध्ये सहभागी झाल्याने, त्याच्यावर दोन वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबन उठल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये खेळला. सध्या तो प्रशिक्षक आणि समालोचन अशा भूमिका बजावताना दिसत असतो.
कारकिर्दीची झोकात सुरुवात करून, फक्त सातत्य राखता न आल्याने भारतीय संघातून बाजूला करण्यात आलेल्या काही कमनशिबी खेळाडूंमध्ये बदानीचा क्रमांक वरचा लागतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
-ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
-सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही