बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यातील शेवटच्या चेंडूमुळे मोठा वाद झाला आहे.
या सामन्यातील मलिंगाने टाकलेला 20 व्या षटकाचा शेवटचा चेंडू नो बॉल होता. मात्र मैदानावरील एस रवी या पंचांच्या हे लक्षात न आल्याने त्यांनी नो बॉलचा इशारा दिला नाही. यामुळे बेंगलोरला नो बॉलचा फायदाही मिळाला नाही. तसेच सामनाही गमवावा लागला. त्यामुळे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने राग व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर 19 व्या षटकात बुमराह गोलंदाजी करत असताना एक चेंडू वाईड नसतानाही सी नंदन या मैदानावरील पंचांनी तो वाईड दिला. यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र एस रवी आणि सी नंदन यांच्यावर मोठ्या कारवाईची शक्यता कमी आहे. बीसीसीआयकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अनुभव असणाऱ्या पंचांची कमी असल्याने रवी आणि नंदन यांच्यावरील कारवाईची शक्य़ता कमी आहे.
सध्या 56 आयपीएल सामन्यांसाठी ऑन फिल्ड आणि टीव्ही ड्यूटीसाठी केवळ 11 पंच उपलब्ध आहेत. त्यामुळे रवी यांना निगेटीव्ह मार्किंग मिळू शकते. पण बीसीसीआय यापेक्षा मोठा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे.
पंचांना असाइनमेंट वाटप करणाऱ्या पंच उप-समितीचे सदस्याने सांगितले की ‘आमच्याकडे आत्ता ऑन फिल्ड आणि टीव्ही ड्यूटीसाठी केवळ 17 पंच आहेत. त्यातील एलिट पॅनलमध्ये 11 भारतीय आणि 6 परदेशी पंचांचा समावेश आहे. चौथ्या पंचासाठी आमच्याकडे सहा पंच आहेत.’
रवी हे आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये एकमेव भारतीय पंच आहेत. पण त्यांच्याकडून मंगळवारी झालेल्या चूकीबद्दल विराटने राग व्यक्त करताना म्हटले आहे की ‘पंचांनी त्यांचे डोळे उघडे ठेवायला पाहिजे.’
तसेच रोहितने सी नंदन आणि रवी या पंचांच्या चूकीच्या निर्णयांबद्दल म्हटले आहे की ‘अशा प्रकारच्या चूका या क्रिकेटसाठी योग्य नाही.’ विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी बीसीसीआयने सी नंदन यांना सर्वोत्तम भारतीय पंचाचा पुरस्कार दिला होता.
कदाचीत रवी आणि नंदन यांना आयपीएलमधील बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे. पण बाद फेरीच्या सामन्यांना अजून बराच वेळ आहे.
बीसीसीआय तसेच सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमलेल्या प्रशासक समितीने (सीओए) भारतीय पंचांच्या अपयशी मानकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परंतु यावर कठोर कारवाईसाठी सक्षम नसल्याचेही म्हटले आहे.
समीतीच्या एका सदस्याने सांगितले की ‘मॅच रेफ्री मनू नायरकडे रिपोर्टमध्ये रवी आणि नंदनकडून झालेल्या चूकांचा उल्लेख करण्याशिवाय कोणता पर्याय नाही. आम्ही मान्य करतो की रवीसाठी असणारा पर्याय हा अजून खराब असेल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही.’
महत्त्वाच्या बातम्या –
–‘आम्ही आयपीएल खेळतो, क्लब क्रिकेट नाही’, अंपायरवर भडकला विराट कोहली
–सामना पराभूत झाला असला तरी कोहली, डिविलियर्सने केले हे मोठे पराक्रम
–दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्स घेतोय रिषभ पंतकडून फलंदाजीचे धडे, पहा व्हिडिओ






