यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघ सेमीफायनलमध्ये तरी पोहोचेल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. इतक्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे नेट रन रेटवर प्रभाव पडला आहे.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या जखमांवर मीठ चोळले आहे. इतकेच नाही तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे आभारही मानले आहेत. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दक्षिण आफ्रिकेचे आभार मानले आहेत. ज्यात त्यांनी म्हटले आहे की टीम इंडियाने त्यातून मोठा धडा घेतला आहे. पुढे काय करावे याबद्दल त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
मांजरेकर यांनी थेट दक्षिण आफ्रिकेचे आभार मानत म्हटलं की, या पराभवामुळे भारताला पुढे काय सुधारणा करायची हे स्पष्ट झालं आहे. त्यांच्या मते, भारतीय फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीविरुद्ध अधिक तांत्रिक आणि संयमी खेळ करणं गरजेचं आहे. तसेच सरावादरम्यान स्लोअर चेंडूंवर अधिक मेहनत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, त्यांनी संघात आणखी एक विकेट घेणारा पर्याय म्हणून कुलदीप यादवला संधी देण्याची स्पष्ट मागणी केली.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 गडी गमावून 187 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडून मिलरने सर्वाधिक 63 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पॉवरप्ले दरम्यान भारतीय संघ पूर्णपणे डगमगला. 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडियाने अवघ्या 10 षटकांत आपले पाच आघाडीचे फलंदाज गमावले. अखेर, भारताचा डाव 18.5 षटकांत 111 धावांवर अटोपला. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक 42 धावा केल्या.






