टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भिडले. या थराराक सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या रोमहर्षक विजयानंतर दोन्ही संघाच्या दिग्गजांनी प्रतिक्रियाही दिल्या. यामध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तर आणि भारताच्या विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे. शोएबने ट्वीट करत पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली तसेच सेहवागने मात्र शेजारच्यांच्या जखमेवरची चांगलीच खपली काढली.
भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताच्या खेळाडूंवर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. त्यातच काही भारतीय दिग्गजांनी मात्र पाकिस्तानच्या पराभवाची मज्जा लुटली. यात विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आघाडीवर आहे. सेहवागने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एका पाकिस्तानी प्रेक्षकाचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्या प्रेक्षकाने पाकिस्तानच्या पराभवानंतर टीव्ही अक्षरश: फोडला. त्याबरोबरच या पोस्टला कॅप्शन देताना सेहवाग हेही म्हटला की,”रिलॅक्स पडोसी! हा तर फक्त एक खेळ आहे आमच्या इथे दिवाळीमुळे फटाके फोडतायेत आणि तुम्ही विनाकारण टीव्ही फोडताय.” एवढच नाही तर ‘इसमे टीव्ही का क्या कसूर’ म्हणत सेहवागने पाकिस्तानी चाहत्यांच्या जखमेवर चांगलचं मीठ चोळलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यांनी सावरल्यानंतर इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर पाकिस्तानने 159 धावांपर्यंत मजल मारली. इफ्तिखारने या डावात 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांच्या जोरावर 51 धावा केल्या. त्याला मसूदने देखील उत्तम साथ दिली. त्याने 42 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या.
https://www.instagram.com/reel/CkD_6D-p3aN/?utm_source=ig_web_copy_link
भारतातर्फे हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. 159 धावांच आव्हान मोडीत काढण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात देखील निराशाजनक झाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव डगमगला. मात्र, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचे डोळे विस्फारले. विराटने शेवटपर्यंत भारताचा किल्ला लढवला. त्याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून मात केली. पाकिस्तानतर्फे हॅरीस रौफ आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी 2-2 गडी टिपले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभव पाकिस्तानचा झळ मात्र ऑस्ट्रेलियाला! भारताकडून 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडीत
T20 World Cup: सावधान, भारत-पाकिस्तान! बांगलादेशचा नेदरलॅंड्सवर निसटता विजय