पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा आपल्या कारकीर्दीत नेहमी वादग्रस्त राहिला होता. निवृत्तीच्या जवळपास अकरा वर्षानंतरही तो आपल्या अशाच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने पाकिस्तानची संस्कृती व खाण्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. ज्याची सध्या चर्चा होतेय.
काय म्हणाला अख्तर
लिजेंड क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेला शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्याशी खास बातचीत करत होता. त्यावेळी ब्रेट ली याने अख्तरला प्रश्न विचारला की, सर्वाधिक वेगवान गोलंदाज पाकिस्तानातूनच का येतात? यावर शोएब अख्तरने जे उत्तर दिले ते चर्चेत आले आहे. शोएब म्हणाला “आमच्याकडे असलेले आदर्श, अन्न, पर्यावरण, दृष्टीकोन तसेच माझ्यासारखे लोक जे उर्जेने परिपूर्ण आहेत. वेगवान गोलंदाजी करण्यात आम्हाला आनंद मिळतो. तुम्ही जे खाता तेच बनता. आम्ही जनावरे खात असल्याने जनावरांसारखे बनतो. वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर आम्ही सिंहासारखे धावतो.”
याच मुलाखतीत बोलताना अख्तरने भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचे कौतुक केले होते. अख्तर म्हणालेला, “डीआरएस प्रणालीचा शोध नव्वदच्या दशकात लागला असता तर, भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे एक लाखाहून अधिक धावा जमा असत्या. या बाबतीत तो दुर्दैवी आहे.”
ओमान येथे झालेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही दिग्गज वेगवेगळ्या संघांचा भाग होते. ली वर्ल्ड जायंट्स तर अख्तर आशिया लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले. ज्यामध्ये वर्ल्ड जायंट्स संघाने आशिया लायन्सचा २५ धावांनी पराभव करत स्पर्धेचे पहिले विजेतेपद आपल्या नावे केले. ही स्पर्धा निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंसाठी आयोजित केली गेली होती. स्पर्धेतील तिसरा संघ इंडिया महाराजा हा होता.
महत्वाच्या बातम्या-
श्रीजेशने वाढविला देशाचा गौरव! पटकावला क्रीडाविश्वातील सर्वोच्च पुरस्कार (mahasports.in)
‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला… (mahasports.in)