भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुवाहाटी येथे तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने आपल्या ‘प्लेइंग 11’ मध्ये दोन मोठे बदल केले आहेत. रवी बिश्नोई आणि जसप्रीत बुमराह यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे, तर वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. 15 सदस्यांच्या या संघात आता केवळ श्रेयस अय्यर असा खेळाडू उरला आहे, ज्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला सोडून इतर सर्व 14 खेळाडू या मालिकेत खेळले आहेत. तिलक वर्मा चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यासाठी उपलब्ध होणार असल्याने, आता श्रेयस अय्यरला संधी मिळणे कठीण आहे. याच कारणामुळे चाहते टीम इंडियाच्या निवडीवर संताप व्यक्त करत आहेत.
श्रेयस अय्यरचे प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियाच्या टी20 संघात पुनरागमन झाले होते. तिलक वर्मा सुरुवातीच्या तीन टी20 सामन्यांतून बाहेर पडल्यामुळे अय्यरची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. गुवाहाटीमध्ये खेळण्याची अय्यरकडे ही शेवटची संधी होती, पण त्याला संघात स्थान दिले गेले नाही. याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत:
‘वरुण चक्रवर्तीला विश्रांती दिली? हा टी20 सामना आहे, जिथे तुम्हाला फक्त 4 षटके टाकायची असतात. रवी बिश्नोईला अचानक खेळवण्याचा काय अर्थ आहे, जेव्हा तो वर्ल्ड कप संघाचा भागही नाहीये? अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर सुद्धा एका सामन्याचा मानकरी ठरतो.’
‘टीम इंडिया नक्की कोणत्या कॉम्बिनेशनसह पुढे जाऊ इच्छित आहे? आपण वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंगला घेऊन जाणार नाही आहोत का? या खेळाडूंना खेळू द्या आणि त्यांचे कौशल्य सुधारण्याची संधी द्या.’






