आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून २७ ऑगस्टपासून युएईत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात विराट कोहली आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. तर श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद शमी, संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यातही इशान आणि श्रेयस यांचे वर्ष २०२२ मधील प्रदर्शन वाखाणण्याजोगे राहिले आहे. तरीही त्यांना आशिया चषकातून डावलण्यात आले आहे.
इशान किशनचे वर्ष २०२२ मधील प्रदर्शन
युवा यष्टीरक्षक आणि सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) याचे आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) भारतीय संघात निवड न होणे चकित करणाची बाब आहे. इशानने चालू वर्षात टी२० क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढत प्रभावित केले आहे. त्याने २०२२ वर्षात आतापर्यंत १४ टी२० सामने खेळताना ३०.७१ च्या सरासरीने ४३० धावा केल्या आहेत. यादरम्यान १३०.३० च्या स्ट्राईक रेटने त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत. तसेच ८९ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. तो भारताकडून यंदा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.
श्रेयस अय्यर तर राहिलाय अव्वल
इशानपेक्षाही श्रेयसने (Shreyas Iyer) त्याच्या प्रदर्शनाने प्रभावित केले आहे. त्याने चालू वर्षात १४ टी२० सामने खेळताना ४४.९० च्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत. तो यंदाच्या वर्षी भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ४ अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत.
अशात श्रेयस आणि इशान टी२० स्वरूपात होणाऱ्या आशिया चषकाचा भाग असायला पाहिजे होते. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर दुर्लक्ष केले आहे, जे अत्यंत निराशादायी आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात पुनरागमन करणारा राहुल ठरेल कोहलीपेक्षा वरचढ!’ भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
गांगुलीची ‘दादा’गिरी पुन्हा होणार सुरू! महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया जाहीर