इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात सध्या पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी (१२ मार्च) या मालिकेतील पहिला टी२० सामना पार पडला. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय संघाच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याने पुढील सामन्यातील रणनितीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघ ३ फिरकीपटूंसह मैदानात उतरला होता. यात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश होता. तर इंग्लंड संघाने सॅम करन, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर या ४ वेगवान गोलंदाजांना अंतिम ११ जणांमध्ये सहभागी केले होते.
यासंबंधी एएनआयला बोलताना अय्यर म्हणाला की, “आम्ही पहिल्या टी२० सामन्यापुर्वी अहमदाबादच्या खेळपट्टीवर सराव केला होता. फिरकी गोलंदाजांना येथे टर्न मिळतो. त्यामुळे पुढेही आमची हीच रणनिती असेल. आम्ही जास्तीत जास्त फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार आहोत. कारण हीच आमची ताकद आहे आणि याच योजनेचा वापर करुन आम्ही इंग्लंडला मागे टाकणार आहोत.”
“आम्हाला आमचा दृष्टीकोन अजिबात बदलण्याची गरज नाही. आमच्या फलंदाजी फळीत फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता नाही. आमच्यासाठी याच रणनितीसह पुढे जाणे गरजेचे आहे, कारण विश्वचषकापुर्वी आम्हाला सर्व पर्यायांची तपासणी करायची आहे,” असे पुढे अय्यरने सांगितले.
श्रेयस अय्यरचे अर्धशतक व्यर्थ
भारतीय संघाच्या डावात सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवनसह कर्णधार विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर इतर फलंदाजांनाही अपेक्षेप्रमाणे साजेशी कामगिरी करता आली नाही. एकट्या श्रेयस अय्यरने संघाचा डगमगता डाव सांभाळत अर्धशतक झळकावले. ४८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. यासह भारताने इंग्लंडपुढे १२५ धावांचे लक्ष्य उभारले.
प्रत्युत्तरात गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या अवघ्या २ विकेट्स काढत धावा खर्च केल्या. त्यातही अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलने ४ षटकात तब्बल ४४ धावा देत फक्त १ विकेट चटकावली. परिणामत: इंग्लंडने १५.३ षटकात भारताचे लक्ष्य पूर्ण केले. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने ३२ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG : दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो ‘हा’ बदल, पाहा संभावित ११ जणांचा संघ
‘रोहित नसेल तर मी सामना पाहणार नाही’, सेहवागचे पहिल्या टी२० सामन्यानंतर मोठे वक्तव्य
जालीम नजर हटा ले! ‘त्या’ काकूच्या नजरेने भल्याभल्यांचे वेधले लक्ष, प्रतिक्रियांचा पडला पाऊस