कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियममध्ये पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे अजिंक्य रहाणेने या सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले. पण आता ३ डिसेंबरपासून मुंबई येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराटचे संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता तो कोणाच्या जागेवर अंतिम ११ संघात खेळणार, याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने देखील याबद्दल आपले मत मांडले आहे. आकाश चोप्राने म्हटले आहे की मुंबई कसोटीसाठी युवा श्रेयस अय्यरने अंतिम ११ जणांच्या संघात जागा पक्की केली आहे, त्यामुळे विराटसाठी अंतिम ११ मधून बाहेर जाणारा खेळाडू श्रेयस अय्यरव्यतिरिक्त दुसरा कोणीतरी असेल.
श्रेयस अय्यरने कानपूर कसोटीतून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्याचे कौतुक करताना स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करताना आकाश चोप्रा म्हणाला की “पदार्पणात शतक आणि अर्धशतक मारणारा पहिला भारतीय खेळाडू अय्यर ठरला. पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी केली कारण तो थोडा सुरुवातीला थोडा नर्व्हस होता. कोणाला माहित नव्हते श्रेयस ह्या प्रकारात काय करू शकतो.”
आकाश चोप्रा म्हणाला की, “दुसऱ्या डावात, माझ्या मतानुसार, खेळणं आव्हानात्मक होतं, म्हणूनच समाधानकारक देखील होतं. त्या ६५ धावा त्याने दबावाखाली केल्या आहेत. कारण पहिल्या डावात तो बाद झाला असता, तरी भारताने दुसऱ्या डावांत फलंदाजी केलीच असती.”
चोप्राने पुढे हे देखील म्हटले की, “कसोटी सामना तुम्हाला आयुष्यात दुसरी संधी देण्यासारखा आहे, पण तेव्हा नाही, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा फलंदाजी करत असता. जर श्रेयस अय्यर दुसऱ्या डावांत बाद झाला असता, तर सामना न्यूझीलंडच्या पक्षात गेला असता. त्याचं तिथे असणं आणि फिरकीपटूंना उत्कृष्टरित्या खेळणं, याकडे आपण दुर्लक्ष करणं हे अशक्य आहे. पुढच्या सामन्यात कोणीही संघात येऊ दे पण, श्रेयस संघाबाहेर होणार नाही, तर दुसरं कोणीतरी होईल.”
श्रेयसने कानपूर कसोटीत पहिल्या डावात १०५ धावांची आणि दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Retention: कोणाच्या ताफ्यात कोण राहिलं कायम अन् कोणाच्या खिशात उरली किती रक्कम? वाचा एका क्लिकवर
‘भावा, आपण करून दाखवलं’, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचे हिरो ठरलेल्या एजाज-रवींद्रची खास मुलाखत