भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीनही प्रकारच्या मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता भारतीय संघात सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड याला संधी मिळू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज या संपूर्ण दौऱ्यावर भारतीय संघात नियमितपणे खेळताना दिसेल.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड याला शुबमन गिल याच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. गिल सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला या दौऱ्यावर विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच, यावर्षी भारतीय संघ वनडे विश्वचषक खेळणार आहे. या विश्वचषकात गिल भारतीय संघाचा सलामीवीर असेल. त्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी विश्रांती दिली जाईल.
ऋतुराज हा भारतीय संघाचा नियमित सदस्य नाही. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीनंतर त्या भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याने आतापर्यंत भारतासाठी 1 वनडे व 9 टी20 सामने खेळले आहेत. मात्र, नुकत्याच संपलेल्या आयपीएल व सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलमध्ये त्याची कामगिरी दमदार होताना दिसतेय. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजेता बनवताना 16 सामन्यात 42.14 च्या सरासरीने 590 धावा केल्या होत्या. तसेच, एमपीएलमध्ये पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्व करताना त्याने तीन सामन्यात 143 धावा केल्या आहेत.
या दौऱ्यावर भारतीय संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते. ऋतुराजसह यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग व जितेश शर्मा यांना टी20 संघात स्थान मिळू शकते. तसेच वेगवान गोलंदाज मुकेश कुमार कसोटी संघात पदार्पण करू शकतो.
(Shubman Gill Might Rested For West Indies Tour Ruturaj Gaikwad Will In Team)
महत्वाच्या बातम्या-
सोलापूरविरूद्ध पुणेरी बाप्पाचे टार्गेट प्ले ऑफ्स! ‘या’ चौकडीकडून आहेत अपेक्षा
MPL: विजयी हॅट्रिकसह कोल्हापूर प्ले ऑफ्समध्ये! सीएसकेचे आव्हान संपुष्टात