---Advertisement---

अश्रू लपवण्यासाठी हरमनने लावला चष्मा, पण चेहऱ्यावर दिसल्या वेदना; म्हणाली, ‘माझ्या देशाने मला रडताना…’

Harmanpreet-Kaur
---Advertisement---

गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताला अपयश आले. ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा 5 धावांनी पराभव केला. भारतीय संघाच्या पदरी पुन्हा एकदा उपांत्य सामन्यात जाऊन पराभव मिळाल्याने निराशाच पडली. यापूर्वी 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यातही भारतीय पुरुष संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. तेव्हाही एमएस धोनी अर्धशतक करून धावबाद झाल्याने भारतावर पराभूत होण्याची नामुष्की ओढावलेली. आता भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतक करून धावबाद झाल्याने पराभव झाला. सामन्यानंतर हरमनप्रीत खूपच भावूक झाली. यावेळी तिने भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाली हरमनप्रीत?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) खूपच दु:खी झाली. सामन्यानंतर बोलताना ती म्हणाली की, आम्ही यापेक्षा जास्त दुर्दैवी होऊ शकत नाही. तिने सामन्यादरम्यान धावबाद होण्याला दुर्दैवी म्हटले. पराभवानंतर अश्रू रोखणे हरमनप्रीतसाठी कठीण झाले होते. ती डोळ्यांवर काळा चष्मा घालून आली होती. मात्र, तिच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. या उपांत्य सामन्यापूर्वी तिला जोराचा तापही होता. मात्र, तिने या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला आणि अर्धशतक ठोकले. मात्र, तिचे धावबाद होणे सामन्याची दिशा पलटणारे ठरले.

https://twitter.com/ICC/status/1628789333472817153

सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली की, “मी यापेक्षा जास्त दुर्दैवी नसू शकते. जेमिमा रॉड्रिग्जसोबत झालेल्या भागीदारीने आम्ही लयीत आलो होतो. ज्या कठीण स्थितीतून आम्ही बाहेर पडलो होतो, त्यानंतर आम्ही पराभवाची अपेक्षाही करत नव्हतो. ज्याप्रकारे मी धावबाद झाले, त्यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीच होऊ शकत नाही.” पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली की, “आम्ही ज्या काही चुका केल्या, त्यातून आम्ही धडा घेऊ. तसेच, पुढील वेळी या चुका होणार नाहीत, याची काळजीही घेऊ.”

https://twitter.com/BCCIWomen/status/1628783082781413376

भारताने पहिल्या तीन विकेट्स फक्त 28 धावांवर गमावल्या होत्या. शफाली वर्मा, स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटिया यांच्या विकेट्स लवकर पडल्या होत्या. मात्र, नंतर जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि हरमनप्रीत कौरने डाव सांभाळत भारताला अडचणीतून बाहेर काढले. दोघींनीही चौथ्या विकेटसाठी 6.2 षटकात 69 धावांची भागीदारी रचली. सामन्याच्या 15व्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीत धावबाद झाली. तिची बॅट खेळपट्टीवर अडकली होती, त्यामुळे ती क्रीझपर्यंत पोहोचू शकली नाही.

https://twitter.com/T20WorldCup/status/1628813887133843458

हरमनप्रीतने जेमिमाला तिच्या दमदार कामगिरीचे श्रेय देत म्हटले की, “अशाप्रकारचा प्रयत्न करणे आणि सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत आव्हान देऊ इच्छित होतो. मी जेमिमाची खास प्रशंसा करू इच्छिते. तिने आम्हाला महत्त्वाची लय मिळवून दिली.”

जेमिमाने या सामन्यात 24 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. तिने डार्सी ब्राऊनच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती यष्टीरक्षक एलिसा हिलीच्या हातात झेल देऊन बाद झाली.

सामन्याचा आढावा
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 172 धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, भारतीय संघ 8 विकेट्स गमावत 167 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी खिशात घातला आणि अंतिम सामन्यात धडक दिली.

आता स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी) केपटाऊनच्याच मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला आमने-सामने आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. (skipper harmanpreet kaur gets emotional after semifinal loss read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पाच कारणांनी भंगले टीम इंडियाचे स्वप्न! विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची पाटी कोरीच
टी20 विश्वचषकातून टीम इंडियाची एक्झिट! सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निसटता पराभव, हरमनची झुंज अपयशी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---