आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा रंगतदार पद्धतीने पुढे जात आहे. स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तसेच, भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचीही बॅट सध्या चांगलीच तळपत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यातील रोहितच्या दमदार प्रदर्शनामुळे भारतीय फलंदाजी विभाग मजबूत स्थितीत दिसत आहे. रोहितच्या विस्फोटक फलंदाजीमुळे विरोधी संघाचे गोलंदाजही चिंतेत पडल्याचे दिसत आहे. अशातच, रोहितच्या नावावर या स्पर्धेत खास विक्रम नोंदवला गेला आहे. तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज
खरं तर, आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा स्ट्राईक रेट उल्लेखनीय आहे. त्याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 122.78च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. अशात रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज (Rohit Sharma First Indian Captain) बनला आहे, ज्याने विश्वचषकाच्या एका हंगामात 122.78च्या स्ट्राईक रेटसह 400 धावा केल्या आहेत. रोहितने 300 पेक्षा जास्त धावा या फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. त्याने आतापर्यंत मोठमोठे फटके मारून 332 धावा केल्या आहेत.
रोहितचा शानदार विश्वचषक
विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यानंतर त्याने शानदार कामगिरी केली. त्याने यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावा, पाकिस्तानविरुद्ध 86, बांगलादेशविरुद्ध 48, न्यूझीलंडविरुद्ध 46, इंग्लंडविरुद्ध 87, श्रीलंकेविरुद्ध 4 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्त्वपूर्ण 40 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 55.25च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन
रोहित शर्मा याच्या आक्रमक अंदाजाने भारतीय संघाला मोठा फायदा मिळत आहे. तो सलामी फलंदाज म्हणून गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून आग ओकत आहे. तसेच, पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. याचा फायदा मधल्या फळीतील फलंदाजांना मिळत आहे. त्यांचे काम खूपच सोपे होत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज शानदार प्रदर्शन करत सर्व सामन्यात धमाल करत आहेत. भारताने आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. यासह भारत 16 गुण मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. भारताचा अखेरचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातही भारत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (skipper rohit sharma became the first indian batsman to score 400 runs in an event with a strike rate of 122)
हेही वाचा-
ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी 3 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, कोण आहे तो नशीबवान भारतीय?
वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रीलंकन संघाला सुट्टी नाही! एसएलसीचे नवे अध्यक्ष लावणार सर्वांना शिस्त