इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर सर्वांना आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयपीएलचा हा हंगाम खेळवला जाणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली विनाप्रेक्षक आयपीएल २०२१ चे सर्व सामने भारतातील वेगवेगळ्या शहरात आयोजण्यात आले आहेत. यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईचा समावेश असून या शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
अशात मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरातील रहिवास्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
मुंबईऐवजी इतर ठिकाणी व्हावे आयोजन
मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफलाही बसला होता. मागील आठवड्यात वानखेडे स्टेडियम ग्राउंड स्टाफमधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे मुंबईतील आयोजित आयपीएल सामने दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची चर्चा सुरू झाली होती.
यात उडी घेत, २ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरातील सजग नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईतील आयपीएल सामने त्रयस्थ ठिकाणी घेण्याची विनंती केली होती. अशीत श्रॉफ नामक व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवर मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या पत्राचा स्क्रिनशॉट शेअर केला होता.
परंतु या पत्रास ४ दिवस लोटले तरी, मुख्यमंत्री ठाकरेंकडून कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही. शुभयन चक्रवर्ती या ट्विटर वापरकर्त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगवान व्हायरल होत आहे.
Rather requested 3 days ago.
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) April 5, 2021
महाराष्ट्र सरकारने दिलीय आयपीएल संघांना सरावाची सूट
महत्त्वाची बाब अशी की, महाराष्ट्र सरकारने रविवार (०४ एप्रिल) पासून मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. तरीही महाराष्ट्र सरकारद्वारे मुंबईत असलेल्या सर्व आयपीएल फ्रँचायझींना रात्री ८ नंतर सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जैव सुरक्षित वातावरणातील नियमांचे काटेकोरपणे पालन करत त्यांना सराव करण्यास सांगितले गेले आहे.
अर्थात आयोजित वेळापत्रकानुसार, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामने होण्याचीही शक्यता आहे. एप्रिल १०, रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हंगामातील दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यासह एकूण १० आयपीएल सामन्यांचे या स्टेडियमवर आयोजन करण्यात आले आहे. हे सामने रात्री साडेसात वाजता सुरू होतील.
महत्त्वाच्या बातम्या-