---Advertisement---

सौरव गांगुलीने भारतातील डे-नाईट टेस्टच्या भविष्याबद्दल केला मोठा खूलासा, म्हणाला…

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2019 7:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाने 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान बांगलादेश विरुद्ध कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर कसोटी इतिहासातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. तसेच या सामन्यात एक डाव 46 धावांनी विजयही मिळवला. या सामन्यासाठी प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

त्यामुळे आता भारतातील सर्व भागात दिवस-रात्र कसोटी सामना पोहचला पाहिजे असे बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.

भारतातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना रविवारी संपल्यानंतर गांगुली म्हणाला, ‘मी आता निवांत आणि आनंदी आहे. कसोटी क्रिकेटसाठी हे करायचे होते. हे इतके महत्वाचे आहे. लोक कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत होते. या दिवस-रात्र कसोटी दरम्यान आणि त्यापूर्वी आम्ही बर्‍याच गोष्टी केल्या. खेळ लवकर संपण्याची अपेक्षा होती तरीही आजही सर्व तिकीटे विकली गेली.’

तसेच स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला, ‘मला 2001ची कसोटी (भारत-ऑस्ट्रेलिया) आठवली. या स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक लोक होते. कोहली, रोहित किंवा इशांत सारख्या चॅम्पियन्स खेळाडूंना रिकाम्या स्टॅन्डसमोर खेळवण्याची इच्छा नाही. त्याचमुळे मला एवढे प्रेक्षक पाहून खूप आनंद झाला.’

त्याचबरोबर गांगुली म्हणाला, ‘आशा आहे की दिवस-रात्र कसोटी सामना देशाच्या इतर भागात पसरेल आणि मला खात्री आहे की असे होईल. यामुळे कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित होईल कारण ते लोकांसाठी वेगळे आहे. काळानुसार सर्व काही बदलते अगदी लोकांची आवडही.’

तसेच भारताचा माजी दिग्गज कर्णधार गांगुलीने टी20 क्रिकेटचेही यासाठी उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘मला आठवते जेव्हा 2007 मध्ये टी20 ची सुरुवात झाली आणि भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा त्या स्वरूपाला फारसे मूल्य दिले गेले नाही. पण 10 वर्षांनंतर, आता टी20 सामना पाहण्यासाठी एकही जागा रिक्त राहत नाही आणि हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना होता.’

113 कसोटी सामने खेळलेला गांगुली पुढे म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की हे यशस्वी होईल. कारण मी सामने खेळले आहेत. मला असे वाटते की या चॅम्पियन खेळाडूंनी नेहमी प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियमसमोर खेळावे.’

भारताच्या अन्य भागातही दिवस-रात्र कसोटी व्हायला हवी, असे सांगताना गांगुली म्हणाला, ‘हा सामना फक्त इडन गार्डन्समध्ये होऊ शकत नाही. यासाठी देशाच्या इतर भागात जाण्याचीही गरज आहे. भारतात खूप मोठी मैदाने आहेत. याचा अनुभव देशभरातील लोकांनी घेतला पाहिजे.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---