भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. वनडे व टी२० मालिका संपल्यानंतर, १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो भारतात परतेल. पहिल्या मुलाच्या जन्मावेळी विराटला पत्नी अनुष्का शर्मासोबत राहायचे आहे. त्यामुळे, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पालकत्व रजेची मागणी केली होती. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे. विराट कोहलीच्या पितृत्व रजेविषयी अनेक क्रिकेट दिग्गजांनी आपले मत व्यक्त केले होते.
मध्यंतरी, सुनील गावसकर यांच्याविषयीही अशी बातमीही आली होती की, त्यांनी आपल्या मुलाच्या जन्मावेळी बीसीसीआयला रजा मागितली होती. मात्र, त्यांना रजा मिळाली नव्हती. आता स्वतः सुनील गावस्कर यांनी, त्या घटनेविषयी मौन सोडले आहे.
अंशुमन गायकवाड यांनी सांगितले होती १९७६ मधील घटना
माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी डेली गार्डियनसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटले होते की, ‘गावसकर यांना आपल्या मुलाला पाहण्यासाठी भारतात यायचे होते. कारण, भारताची पुढील मालिका तीन आठवड्यांनंतर वेस्ट इंडिजमध्ये खेळली जाणार होती. परंतु बीसीसीआयने त्यांना परवानगी दिली नव्हती.’ अंशुमन गायकवाड यांच्यासोबतच माजी कर्णधार कपिल देव यांनीदेखील ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.
गावसकर यांनी केला खुलासा
अंशुमन गायकवाड आणि कपिल देव यांच्या या वक्तव्यानंतर आता स्वत: सुनील गावसकर यांनी त्या घटनेचा उलगडा केला आहे. ‘मिड डे’साठी लिहिलेल्या स्तंभात गावसकर म्हणाले, “मी कधीही बीसीसीआयला पालकत्व रजेविषयी विचारले नव्हते. १९७६ च्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांसाठी जाताना मला माहित होते की, यादरम्यान माझ्या अपत्याचा जन्म होऊ शकतो. मी देशाकडून खेळण्यासाठी कटिबद्ध होतो. माझ्या पत्नीनेही मला पाठिंबा दर्शवला होता.”
पॉली उम्रीगर यांना मागितली होती परवानगी
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत सुनील गावसकर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना काही आठवडे विश्रांती घेण्यास सांगण्यात आलेले. गावसकर यांनी पुढे लिहिले, ‘न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्याने डॉक्टरांनी मला चार आठवडे विश्रांती घेण्यास सांगितलेले. पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन आठवड्यांनंतर होणार होता. त्यावेळी मी घरी जाऊ शकतो का? वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी मी संघात सामील होईल, असे मॅनेजर पॉली उम्रीगर यांना विचारले. मात्र, त्यांनी नकार दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.’
विराट परतणार आहे भारतात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर विराट मायदेशी परतेल. त्याची पत्नी अनुष्का लवकरच पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. विराट मायदेशी परतल्यानंतर, अजिंक्य रहाणे उर्वरित तीन सामन्यात भारताचे नेतृत्त्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऑस्ट्रेलियाने आम्हाला चित केले’, मालिका गमावल्यानंतर विराटची प्रतिक्रिया
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला





