भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपले आत्मचरित्र, ‘बिलीव, व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी’ यामध्ये आपल्या आयुष्यातील आणि क्रिकेट कारकिर्दीतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये त्याने माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे.
रैनाने या आत्मचरित्रात माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली बोलताना म्हटले आहे की, “सौरव गांगुलीच्या म्हणण्यावर ग्रेग चॅपल यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. परंतु त्यानंतर ग्रेग चॅपल यांनी सौरव गांगुलीला संघाबाहेर केले होते.” ग्रेग चॅपल हे २००५ ते २००७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २००७ विश्वचषक स्पर्धेतून पहिल्याच फेरीमधून बाहेर झाला होता. त्यामुळे त्यांना प्रशिक्षक पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी एमएस धोनीला देखील अश्रू अनावर झाले होते.
रैनाने लिहिले की, “मला असे वाटते की, भारतीय खेळाडूंच्या पिढीला आकार देण्याचे श्रेय ग्रेगला द्यायला हवे. त्यांनी ज्या बिया पेरल्या होत्या. त्याचे फळ नंतर दिसून आले. जेव्हा भारतीय संघाने २०११ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मला असे वाटते की, ते प्रशिक्षक असताना कितीही वाद विवाद झाले तरीही त्यांनी भारतीय संघाला जिंकणे आणि जिंकण्याचे महत्व पटवून दिले होते.” अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे २०११ सालच्या विश्वचषक विजयाचे श्रेय रैनाने ग्रेग यांना दिले आहे.
सुरेश रैनाने ग्रेग चॅपल यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच युवराज सिंग, एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांसारखे खेळाडू ग्रेग चॅपल यांच्या मार्गदर्शनात चमकले होते. या कालावधीत भारतीय संघाने धावांचा पाठलाग करणे शिकून घेतले होते. त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना १४ सामन्यात विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय सुरेश रैनाने ग्रेग चॅपल यांना दिले आहे.
सुरेश रैनाने म्हटले की, “त्यांनी आम्हाला धावांचा पाठलाग कसा करावा? हे शिकवले होते. मला आठवते की, आम्ही त्यावेळेस चांगले खेळत होतो. ते मीटिंगमध्ये धावांचा पाठलाग कसा करायचा? यावर जोर द्यायचे. याचे श्रेय ग्रेग आणि राहुल दोघांना जाते. त्यावेळी फलंदाजी क्रम देखील निश्चित झाला होता. युवी, धोनी आणि मी खेळत असे. तोपर्यंत आम्ही दबाव कसा सहन करायचा हेही शिकलो होतो. यासोबतच धावांचा पाठलाग आणि जिंकणेही शिकलो होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
टीव्हीवर सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघून सेहवाग शिकला ‘हा’ फटका, स्वत: विरुनेच केलाय खुलासा
माजी भारतीय निवडकर्ता म्हणतोय, ‘ही’ चूक सुधारा, मग कसोटी चॅम्पियनशीप आपलीच