आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयने विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. संघात काही हैराण करणारी नावेही सामील केली गेली आहेत. संघाच्या सलामीवीराच्या भूमिकेत रोहित शर्मा असणार आहे. मात्र, त्याचा जोडीदार कोण असेल, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विश्वचषकात त्याच्यासोबत केएल राहुल असेल की कर्णधार विराट कोहली त्याच्यासोबत सलामीसाठी मैदानात दिसेल याविषयी संभ्रम आहे. यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने टी२० मध्ये सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. असे असले तरी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित झाल्यानंतर मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना संघाच्या सलामीवीरांविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी उत्तर देत हे स्पष्ट केले की, रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील. ही भारतीय संघाची मुख्य ओपनिंग जोडी आहे.
कर्णधार कोहलीच्या ओपनिंग करण्याविषयी ते म्हणाले की, विराट मध्यक्रमातील फलंदाजीचा प्रमुख आहे. विराट संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज आहे. जेव्हा तो मध्यक्रमात खेळतो, तेव्हा सपूर्ण संघ त्याच्या आजू-बाजूला खेळत असतो. असे असले तरी, जर वेळेची गरज असेल आणि संघ व्यवस्थापन ही विचार करत असेल की, विराटने सलामीला फलंदाजी केली पाहिजे. पण आता सध्या आमच्याकडे तीन सलामीवीर आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि ईशान किशन.
विराटने भविष्यात सलामीवीराची भूमिका पार पाडण्याची इच्छा केली होती व्यक्त
कर्णधार विराटने इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात झालेल्या टी२० मालिकेत आणि आयपीएल २०२१ मध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी सलामीला फलंदाजी केली होती. त्याने आयपीएल २०२१ च्या आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यात १९८ धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंविरुद्धच्या टी २० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करून नाबाद ८० धावा केल्या होत्या.
त्यानंतर त्याने भविष्यातही सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. असे असले तरी निवडकर्ता यासाठी तयार नाहीत आणि त्यांनी संघात तिसऱ्या सलामीवीराच्या रूपात ईशान किशनला संधी दिली आहे.
विराटने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये ५२ च्या सरासरीने ३१५९ धावा केल्या आहेत. त्याने यापैकी ८ सामन्यात सलामीवीराची भूमिका पार पाडली असून २७८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट नाबाद ८० धावा इंग्लंविरुद्ध केल्या आहेत.
ईशान किशनने एकदिवसीय आणि टी २० पदार्पणात केले अर्धशतक
ईशान किशनने या वर्षी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने त्याच्या टी २० आणि एकदिवसीय पदार्पणात अर्धशतक केले आहे. त्याने टी२० मध्ये डावाची सुरुवात करत हे अर्धशतक केले आहे. तर एकदिवसीयमधील अर्धशतक त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केले आहे. त्याच्या प्रदर्शनामुळेच त्याला टी२० विश्वचषमध्ये संघात पर्यायी यष्टीरक्षक आणि सलामीवीराच्या रूपात घेतले आहे.
ईशानवर संघाच्या तिसऱ्या सलामीवीराची जबाबदारी
मुख्य निवडकर्त्यांनी ईशानच्या संघातील निवडीविषयी सांगितले की, तो डावाची सुरुवात करण्यासह मध्यक्रमातही फिट होऊ शकतो. विशेषकरून डावाची सुरुवात करताना लेफ्ट-राइट काॅम्बिनेशन महत्वाचे असते. जर विरोधी संघात लेग स्पिनर आहे, तर त्याच्यासारखा डाव्या हाताचा फलंदाज संघाच्या खूप कामी येऊ शकतो. जर आम्हला सलामीवीराची गरज असेल तर ईशान ते करू शकतो. कारण त्याने टी २० पदार्पणात अर्थशतक केलेले आहे. तसेच मध्यक्रमात तो फिरकी गोलंदाजांनाही चांगल्या प्रकारे खेळू शकतो.
ईशानने आयपीएल २०२० हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या
ईशानने मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याकडे यूएईमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी १४ सामन्यात ५७ पेक्षा जास्त सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनानंतर त्याला इंग्लंविरुद्ध टी २० मालिकेत संधी दिली गेली होती. त्याने मालिकेत चांगले प्रदर्शन करून भारतीय संघात जागा मिळवली आणि टी२० विश्वचषकासाठीच्या संघातही स्थान पक्के केले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी अनुभवी चहलला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी केले स्पष्ट
धोनीला नेटमध्ये सराव देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूचा धमाका; वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेत मिळवून दिला विजय






