टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. ७ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानसह अनेक देश मैदानात उतरले. भारताने युएसएचा (USA) पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलँड्सवर मात केली. या टी-२० विश्वचषकात एकूण २० देश सहभागी होत आहेत. या २० संघांमध्ये भारतीय वंशाचे एकूण ४१ खेळाडू खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेपासून न्यूझीलंडपर्यंत अनेक बलाढ्य देशांच्या संघांत भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे.
कॅनडाच्या संघात टी-२० विश्वचषकासाठी भारतीय वंशाच्या एकूण ११ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, तर युएसएच्या संघात भारतीय वंशाच्या ९ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॅनडाचे नेतृत्व दिलप्रीत बाजवा आणि युएसएचे नेतृत्व मोनांक पटेल करत आहेत. हे दोन्ही कर्णधार भारतीय वंशाचेच आहेत.
टी-20 विश्वचषकात केवळ भारतच नाही, तर इतर अनेक देशांच्या संघांतही भारतीय वंशाच्या खेळाडूंचा मोठा भरणा आहे. युएई (UAE) आणि ओमान या दोन्ही देशांच्या संघात प्रत्येकी ७ भारतीय वंशाचे खेळाडू खेळत आहेत. युएईच्या संघात अलीशान शराफू, आर्यन शर्मा, सिमरनजीत सिंह, मयंक कुमार, ध्रुव पराशर, हर्षित कौशिक आणि रोहिद्द सिंह यांचा समावेश आहे; तर ओमानकडून जतिंदर सिंह, विनायक शुक्ला, अषीश ओडेदरा, जय ओडेदरा, करण सोनावले, जितेन रामानंदी आणि वासिम अली मैदानात उतरले आहेत. न्यूझीलंडच्या संघात रचिन रवींद्र आणि ईश सोढी हे दोन स्टार खेळाडू आहेत, तर नेदरलँड्सच्या संघात ऑफ-स्पिनर आर्यन दत्त आणि सलामीवीर विक्रमजीत सिंह भारतीय वंशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय इटलीकडून जसप्रीत सिंह, दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि वेस्ट इंडिजच्या संघात गुडाकेश मोती या भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे.






