भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पाच गडी राखून सामना सहज जिंकला. आता जयपूर येथील टी२० सामनाजिंकल्यानंतर भारतीय संघाच्या नजरा शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यावर असतील. जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील हा सामना जिंकून, रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घ्यायची आहे. दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय संघाचा विजयाचा विक्रम १०० टक्के राहिला आहे. भारतीय संघाने येथे झालेले दोन्ही टी२० सामने जिंकले आहेत. पहिला टी२० सामना १२ फेब्रुवारी २०१६ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला होता, जो भारतीय संघाने ६९ धावांनी जिंकला होता. दुसरा टी२० सामना ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला नऊ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
मागील सामन्यात भारताला शेवटच्या चार षटकांमध्ये २३ धावांची गरज होती. यात भारतीय संघाला लवकर विजय मिळवला आला असता. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन या वेगवान त्रिकुटाने अंतिम षटकांत जबरदस्त गोलंदाजी करत केवळ १३ धावा देत सामना रोमांचक केला होता. याशिवाय न्यूझीलंड संघ मार्टिन गप्टिल (४२ चेंडूत ७० धावा) आणि मार्क चॅपमन (५० चेंडूत ६३) यांच्या शानदार खेळ आणि आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर खूश असेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ: टीम साऊदी (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम सेफर्ट, ईश सोधी.