आज(9 फेब्रुवारी) 13 व्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने भारतीय संघाचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले आहे. त्यामुळे क्रिकेटला नवा युवा विश्वविजेता संघ मिळाला आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा बांगलादेश 7 वा संघ ठरला आहे. याआधी भारतीय संघाने सर्वाधिक 4 वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने 3 वेळा हा विश्वचषक जिंकला आहे.
त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पाकिस्तानने 2 वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. तसेच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि आता बांगलादेश या संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे.
2020च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघा बरोबरच बांगलादेश संघाचीही सांघिक कामगिरी उत्तम झाली. या विश्वचषकात भारताचे यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई, अथर्व अंकोलेकर, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा हे खेळाडू चांगलेच चमकले.
या संघांनी जिंकला आहे १९ वर्षांखालील विश्वचषक:
1988: ऑस्ट्रेलिया
1998: इंग्लंड
2000: भारत
2002: ऑस्ट्रेलिया
2004: पाकिस्तान
2006: पाकिस्तान
2008: भारत
2010: ऑस्ट्रेलिया
2012: भारत
2014: दक्षिण आफ्रिका
2016: विंडीज
2018: भारत
2020: बांगलादेश






