भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून 5 सामन्यांची टी-20 (T20I) मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय (ODI) मालिकेत आमनेसामने असतील. इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने (BCCI) झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारतीय संघाच्या पुढील दोन मालिकांबाबत निवड समितीने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. एकीकडे झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 (india vs Zimbabwe) सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी संघात महत्त्वाचे बदल केले आहेत. सध्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची सर्वाधिक चर्चा होत आहे, ज्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson drop) संघातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने (BCCI) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 सदस्यांचा संघ निवडला आहे. ही 3 सामन्यांची टी-20 मालिका हरारेमध्ये खेळली जाईल. संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार असेल. संघात वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिंस यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे. तसेच, यष्टिरक्षणाची जबाबदारी ईशान किशन आणि प्रभसिमरन सिंग सांभाळतील. संजू सॅमसनची निवड न होणे हा या संघाबाबत चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे.
अलीकडच्या काळात टी-20 संघाचा भाग असलेल्या संजूला यावेळी संधी मिळाली नाही, तर निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिंस यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक).
दरम्यान, निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही संघात बदल केले आहेत. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या जागी शिवम दुबेला भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.





