मेलबर्न। आज(8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या आहेत आणि भारताला विजयासाठी 20 षटकात 185 धावांचे आव्हान दिले आहे.
मात्र, हा सामना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना भारताची यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटिया (Taniya Bhatia) दुखापतग्रस्त झाली. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासन (Jess Jonaasen) गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भाटियाला दुखापत झाली.
यावेळी फलंदाजी करत असताना भाटियाने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू मिस झाल्याने तो सरळ येऊन तिच्या हेलमेटच्या उजव्या बाजूस लागला. त्यानंतर लगेचच वैद्यकीय पथकाने येऊन तपासले. त्यानंतर ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडली.
त्यानंतर तिच्याऐवजी भारताने बदली खेळाडू म्हणून रिचा घोषला संघात स्थान दिले. पण ती 18 धावा करुन बाद झाली.






