आयपीएल २०२१ चा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझरर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात मुंबई संघाने हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमक निर्धारित २० षटकात २३५ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई संघाच्या या आक्रमक फलंदाजीत आयपीएलचे अनेक विक्रमांच्या नोंदी झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी एकाच डावात अवघ्या २० चेंडूंच्या आत अर्धशतक झळकावली आहेत. ईशान किशनने १६ चेंडूत ५० धावा केल्यास तर सुर्यकुमार यादवने १७ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. याआधी कोलकाता नाईट रायडर्सने २०१७ च्या आयपीएलमध्ये हा पराक्रम केला होता. त्यावेळी सुनील नरेन याने १५ चेंडूत अर्धशतक केले होते, तर ख्रिस लिन याने १९ चेंडूत अर्धशतक केले होते.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवला. ईशानने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने ५.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ १८ धावांचं होतं. रोहितला राशिद खानने बाद केले. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या अवघ्या १० धावांवर बाद झाला.
हार्दिकनंतर कायरन पोलार्ड १३ धावांचं योगदान देऊन तंबूत परतला. मात्र इशान किशनने एक टोक लावून धरत प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने देखील हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्लाबोल केला. सूर्यकुमारने ४० चेंडूत ८२ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
ईशान आणि सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या बदल्यात २३५ धावांचा डोंगर उभा केला. नंतर हैदराबाद संघ २० षटकात ८ बाद १९३ धावा करू शकला आणि मुंबईचा ४२ धावांनी विजय झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्यास काय होणार? वाचा काय आहेत आयसीसीचे नियम
बुमराह ऑन फायर! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथाच भारतीय गोलंदाज
मुंबईच्या फलंदाजांनी सनरायझर्सचा उडवला धुव्वा, संघाला गाठून दिली आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या