भारतीय संघाला आजपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये २५, कसोटी क्रिकेटमध्ये ३३ तर टी२० क्रिकेटमध्ये ७ कर्णधार लाभले आहेत. यातील फारच कमी कर्णधार असे आहेत, ज्यांनी भारतीय संघाचे तीनही प्रकारच्या क्रिकेटमधे नेतृत्त्व केले आहे. एमएस धोनी, अजिंक्य रहाणे व विराट कोहली या तीन खेळाडूंना भारतीय संघाचे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. परंतु, सध्याच्या बीसीसीआयचा कर्णधार बदलण्याचा वेग पाहाता रोहित शर्माला ही लवकरच मिळेल असे वाटते.
२००७ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला रोहित शर्मा (Team India) भारतीय संघातील सध्याचा सर्वात सिनीयर खेळाडू आहे. सुरुवातीला संथ गतीने सुरु झालेले रोहितचे करियर २०१३ नंतर बऱ्यापैकी सावरले. त्यानंतर तो काही वर्षांतच मर्यादीत षटकांतील महत्त्वाचा खेळाडू ठरु लागला. आज २०२१मध्ये तर रोहितकडे टी२० व वनडेचे कर्णधारपद आणि कसोटीचे उपकर्णधारपद आले आहे. त्याला त्याने गेल्या काही वर्षांत केलेली कामगिरी नक्कीच जबाबदार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने जे यश मिळवलं आहे, त्यात रोहितचा वाटा नक्कीच मोठा आहे. अगदी ते कुणालाही नाकारता येणार नाही. तसेच जेव्हा जेव्हा वनडे व टी२० संघाचे कर्णधारपद (Captaincy) भूषविण्याची संधी मिळाली, तेव्हा रोहितने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे.
वनडेत १० सामन्यात ८ विजय तर टी२०मध्ये २२ सामन्यात १८ विजय त्याने कर्णधार म्हणून मिळवले आहे. एक प्रभारी कर्णधाराची भूमीका त्याने यापूर्वी योग्यरितेने निभावले आहे. मात्र, असे असले तरी आता रोहितकडे मर्यादीत षटकांचे कर्णधारपद देणे अताच्या घडीला अनेक कारणांमुळे चूकीचे ठरू शकते. त्याच कारणांचा या लेखात आढावा घेऊ.
१. युवा खेळाडूंना द्यायला हवी होती संधी
रोहित शर्माला कर्णधारपद देण्यापूर्वी त्याच्या वयाचाही विचार व्हायला हवा होता. रोहितआधी कर्णधारपदी असणाऱ्या विराटचे वय ३३ वर्षे आहे, असे असताना त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या रोहितकडे कर्णधारपद दिल्यास काहीप्रमाणात युवा खेळाडूंची प्रतिभा वाया जाण्याची शक्यता दाट आहे.
रोहितचे सध्याचे वय ३४ वर्षे आहे. त्यामुळे विचार करायचा झाल्यास साधरण २-३ वर्षांचे क्रिकेट त्याच्याकडे बाकी असावे. असे असताना तो साधारण २०२३-२०२४ पर्यंत नेतृत्त्व करू शकतो. अशा परिस्थितीत सध्या कर्णधारपदासाठी सध्या प्रबळ दावेदार असलेले युवा क्रिकेटपटू केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत हे खेळाडू २०२३ पर्यंत साधारण तिशी पार करतील. त्यामुळे हा विचार करायचा झाल्यास आत्ताच अशा खेळाडूंमध्ये कर्णधार म्हणून गुंतवणूक केली असती, तर दिर्घकाळासाठी एक चांगले नेतृत्त्व भारताला मिळू शकले असते.
गेल्या काही वर्षांतील विचार केल्यास भारतीय क्रिकेटमध्ये नेतृत्त्वासाठी युवा खेळाडूंमध्येच गुंतवणूक केल्याचे लक्षात येते. सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली अशी काही यासाठी उदाहरणे आहेत. या क्रिकेटपटूंकडे साधारण ते २७-२८ वर्षांचे असताना नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे भारताकडे दीर्घकाळासाठी कर्णधार म्हणून चांगला पर्याय उपलब्ध होता. पण, यावेळी रोहितकडे कर्णधारपद देण्यात आल्याने कुठेतरी अन्य युवा खेळाडूंच्या कौशल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
तसेच येत्या ३ वर्षांत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा देखील आहेत. अशा परिस्थितीत रोहित भारताचा प्रमुख फलंदाज असणार आहे. असे असताना त्याच्यावर या स्पर्धांत नेतृत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी दबाव टाकू शकते.
तसेच जर गेल्या २-३ वर्षांतील कामगिरीबाबतच बोलायचे झाल्यास रोहितबरोबर केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर यांनी देखील आपली योग्यता वेळोवेळी सिद्ध केली आहे. रोहितने वनडेत २०२० पासून ४३ च्या सरासरीने धावा केल्यात, तर केएल राहुलने ६२, श्रेयस अय्यरने ३७ आणि रिषभ पंतने ६१ च्या सरासरीने धावा केल्यात. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये रोहितने ४० च्या सरासरीने धावा केल्यात, तर केएल राहुलने ३६, श्रेयसने ३२ आणि पंतने ३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंची कामगिरीही रोहितपेक्षा फार वाईट नाही. त्यामुळे दीर्घकाळाचा विचार करुन कर्णधारपदासाठी युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकले असते.
२. रोहितचे अपयश झाकोळले गेले
भारताला गेल्या ८-९ वर्षांमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. या अपयशासाठी संघाचा कर्णधार म्हणून कधी एमएस धोनी, विराट कोहलीला, तर कधी संघव्यवस्थापनाकडे बोट दाखवण्यात आले. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. पण अशावेळी रोहितची कामगिरीकडे कोणाचेही फारसे लक्ष गेले नसल्याचे लक्षात येते.
संघातील प्रमुख फलंदाज म्हणून रोहित देखील आयसीसी स्पर्धांतील मुख्य किंवा मोक्याच्या क्षणी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहितने २६ चेंडूत २९ धावा केल्या होत्या, त्यानंतर २०१५ सालच्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यात रोहित ४८ चेंडूत ३४ धावा करुन बाद झाला होता. २०१६ साली झालेल्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात रोहितने ४३ धावा केल्या होत्या. २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला, तर २०१९ वनडे विश्वचषकात त्याला १ धावेवर विकेट गमवावी लागली. २०२१ साली झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने ३४ आणि ३० धावा केल्या होत्या, २०२१ या वर्षीच झालेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मोठ्या सामन्यातच रोहित शुन्य आणि १४ धावांवर बाद झाला होता.
ही कामगिरी पाहाता, रोहित महत्त्वाच्या क्षणी अपयशी ठरल्याचेच दिसले आहे, जरी रोहितची संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी असली तरी तो महत्त्वाच्या क्षणी अपयशी ठरल्याने भारतीय संघाला मोठे नुकसात झाल्याचेच दिसून आले आहे. मात्र, टीकाकांची बोटे कर्णधाराकडे किंवा संघसंयोजनाकडे वळालेली दिसली. त्यांच्या टीकेमध्ये तथ्य असले, तरी काही प्रमाणात का होईना पण महत्त्वाच्या सामन्यांमधील रोहितचे अपयश या टीकांमुळे झाकोळले गेले.
याचबाबतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या ३-४ वर्षांपासून रोहित नियमितपणे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधारपदाची भूमीका निभावत आहे. उपकर्णधार हा कर्णधाराला मदतच करत असतो. तसेच संघाबाबत कोणताही निर्णय घेताना कर्णधार, प्रशिक्षकाबरोबरच उपकर्णधाराची भूमीकाही महत्त्वाची असते. तोही नेतृत्त्व गटातील महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे जर कर्णधार म्हणून विराट अपयशी ठरला असेल, तर रोहितही उपकर्णधार म्हणून अपयशी ठरला असे म्हणावे लागेल. कारण, त्याचे उपकर्णधार म्हणून किती योगदान होते, यावर अशावेळी प्रश्नचिन्ह निर्माण होते.
३. लीग क्रिकेटमधील यश मापदंड असू शकतो का?
रोहितला कर्णधार म्हणून मोठे यश मिळाले ते इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धेमध्ये. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ आयपीएल विजेतीपदं आपल्या नावे केली. यातूनच रोहितच्या नेतृत्त्वाची चूणूक प्रत्येकाला पाहायला मिळाली. पण, जरी रोहितला एक कर्णधार म्हणून यश मिळाले असले, तरी मुंबई संघात असलेल्या दिग्गज खेळाडूंनी दाखवलेल्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
त्याचबरोबर लीग क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यामध्ये मोठा फरक आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून गणला जातो, तो आयपीएलमधीलही एक यशस्वी कर्णधार आहे. पण असे असले तरी सर्वाधिक विजेतीपदं जिंकण्याच्या बाबतीत त्याला देखील रोहित शर्माने मागे टाकले आहे.
एवढेच नाही तर, असे अनेक कर्णधार आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात, तर लीग क्रिकेटमध्ये फ्लॉप होतात, तर काही कर्णधार आहेत, ज्यांनी लीग क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत. असे असताना केवळ भावनिक होऊन रोहितला कर्णधारपद देणे, योग्य ठरू शकते का, हा विचार देखील व्हायला हवा होता.
जर मोठ्या स्पर्धांमध्ये संपूर्ण संघ अपयशी ठरत असेल, तर केवळ नेतृत्त्वात बदल केल्याने यश मिळणार आहे का? काही बदल हे संघरचनेत देखील व्हायला हवेत, हा विचार नेतृत्त्व बदल करताना झाला का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहेत.
४. रोहितचा फिटनेस
भारताच्या सर्वांत फिट क्रिकेटपटूंमध्ये रोहितला गणलं जात नसलं, तरी यापूर्वी रोहितच्या फिटनेसबाबत कोणत्याही तक्रारी आल्या नव्हत्या. मात्र, गेल्या २ वर्षांत रोहितला फिटनेसबाबतीत लहान-मोठ्या कुरबूरी सुरु झाल्याचे दिसून आले आहे. त्याला गेल्या २ वर्षांत दुखापतींमुळे काही सामन्यांना मुकावेही लागले आहे. त्यातच त्याचे वय आता ३४ पार करुन गेले असल्याने फिटनेस हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी टाकणे नक्कीच जोखमीचं ठरण्याची शक्यता दाट आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना! रोहित शर्मासाठी २०२१ वर्ष ठरलं धमाकेदार, ‘या’ आहेत ५ उत्कृष्ट खेळी
गौतम गंभीर आता दिसणार मेंटॉरच्या भूमीकेत, ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी