India vs England Oval Test: भारतीय क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिल याने ही जबाबदारी स्वीकारल्यापासून तो आपल्या मर्जीनुसार संघाला चालवत आहे, असे दिसत आहे. कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवायचे आणि कोणाला नाही, याचा निर्णय तो स्वतःच्या मनाप्रमाणे घेतो. कामगिरीला बाजूला ठेवून गिल आपल्या यारी-दोस्तीच्या मागे लागला आहे. जे खेळाडू धावा करत नाहीत किंवा खूप धावा देत आहेत, ते गिलला जास्त आवडत आहेत. याच कारणामुळे अनेक खेळाडूंचे करिअर धोक्यात आले आहे. कितीतरी खेळाडू संपूर्ण मालिकेत बाहेरच बसून राहिले, पण गिलने त्यांच्याकडे डोकावूनही पाहिले नाही. (Shubman Gill Captaincy)
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवारी ओव्हलमध्ये सुरू झाला आहे. भारताने या सामन्यात एकूण 4 बदल केले आहेत. सततच्या खराब खेळामुळे चौथ्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या करुण नायरची पुन्हा एकदा संघात वापसी झाली आहे. इतकेच नाही, तर केवळ एकच अर्धशतक झळकावणारा साई सुदर्शन अजूनही खेळत आहे. तर अभिमन्यू ईश्वरन संपूर्ण मालिकेत बेंचवर बसून आराम करत राहिला, पण त्याला संधी मिळाली नाही. (Team India Playing XI)
गिल आपल्या जवळच्या खेळाडूंना सतत संधी देत आहे, मग त्यांची कामगिरी कितीही खराब असो. साई सुदर्शन आयपीएलमध्ये गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्ससाठी खेळतो. त्यामुळेच त्याला आधी संघात स्थान मिळाले आणि कसोटी पदार्पणही करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी विशेष नसतानाही, 2 सामन्यातून बाहेर राहिल्यानंतर त्याने पुन्हा संघात वापसी केली. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात साईने भलेही संथ अर्धशतक केले असेल, पण दुसऱ्या डावात तो अशा पद्धतीने बाद झाला की, शाळेतील मुलगाही कदाचित असा शॉट खेळणार नाही. पण तो आता पाचवा सामनाही खेळत आहे. तो आपल्या कामगिरीमुळे खेळत आहे का? कदाचित नाही, त्याला गिलचा जवळचा मित्र असल्याचा फायदा मिळत असल्याचे दिसत आहे. (Indian Cricket Team Selection)
आता प्रसिद्ध कृष्णाबद्दल बोलायचे झाल्यास, ज्याने पहिले 2 कसोटी सामने खेळले, पण इतक्या धावा लुटल्या की, त्या पुढील अनेक वर्षे लक्षात राहतील. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले, पण शेवटच्या कसोटीत पुन्हा कसे कोण जाणे, त्याची संघात वापसी झाली. मागील सामन्यातच पदार्पण करणारा अंशुल कम्बोज फक्त एकच सामना खेळून बाहेर पडला आहे. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 128 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर याच सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 92 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात प्रसिद्धने कोणतीही विकेट न घेता 72 धावा दिल्या. यानंतर दुसऱ्या डावात त्याने 39 धावा देऊन 1 विकेट घेतली. आता तो हा सामना कसा खेळत आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. (Prasidh Krishna Performance)





