भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने मोहालीमध्ये मिळवलेला हा सलग ५ वा कसोटी विजय आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंका संघाने पहिल्या डावात १७४, तर फॉलो ऑन मिळाल्यावर दुसऱ्या डावात १७८ धावा केल्या.
भारतीय संघातील (Team india) खेळाडूंनी सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन केले. आपण या लखात अशाच पाच भारतीय खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांनी सामना जिंकण्यासाठी संघाला महत्वाचे योगदान दिले. (Ind vs SL Test Series)
भारताच्या विजयात महत्वाचे योगदान दिलेले पाच खेळाडू
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) –
भारतीय संघाला सामना जिंकवून देण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली, ती म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजाने. पहिल्या डावात फलंदाजी करताना जडेजाने १७५ धावा केल्या आणि नाबाद राहिला. तसेच गोलंदाजीमध्ये तब्बल ९ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ५, तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स जडेजाने घेतल्या. या जबरदस्त प्रदर्शनासाठी जडेजाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
रिषभ पंत (Rishabh pant) –
सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही बहूमुल्य योगदान दिले. रिषभ पंतने पहिल्या डावात ९६ धावा केल्या आणि थोडक्यात शतक हुकले. रिषभ पंतने मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि सध्या तो प्लेइंग इलेव्हनचा नियमित सदस्य बनला आहे. त्याने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) –
मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात फिरकी गोलदाज रविचंद्रन अश्विन तिसरा सर्वोत्तम प्रदर्शन करणारा खेळाडू ठरला. अश्विनसाठी हा सामना खास ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन केले. पहिल्या डावात अश्विनने ६१ धावा केल्या. तर पहिल्या डावात गोलंदाजी करताना दोन विकट्स घेतल्या, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यात अश्विन भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार दुसरा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार कपिल देवला मागे सोडले.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) –
या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विजयासाठी चौथा सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. सामन्यात बुमराह दोन खेळाडूंची शिकार करू शकला. बुमराहच्या लाइन आणि लेंथमुळे श्रीलंकन खेळाडूंना अडचण निर्माण होताना दिसली. या कारणास्तव त्यांना बुमराहच्या गोलंदाजीवर जास्त धावाही करता आल्या नाहीत.
मोहम्मद शमी (Mohammad Shami)
भारताला मिळालेल्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही योगदान महत्वाचे राहिले. शमीच्या लाइन लेंथ पुढेही श्रीलंकन खेळाडूंना धावा करण्याची संधी मिळाली नाही. शमीने सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्सही घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
Video: मोहम्मद अझरुद्दीन मुलाचा षटकार पाहून खूश! फ्रेंडशीप कपमध्ये बाप-लेकाच्या जोडीचा धुमाकूळ
आयपीएल पाहण्यासाठी धोनीने चक्क ‘आऊट’ झाल्याचा बनवला बहाना, नवा प्रोमो घालतोय इंटरनेटवर धुमाकूळ
मोहाली कसोटीदरम्यान विराटची प्रेक्षकांसोबत मस्ती, संघाला चिअर करण्याचे अवाहन, व्हिडिओ व्हायरल