१९९० नंतर, अनिल कुंबळे हा भारतीय फिरकी गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख होता. सहा-सात वर्ष एकटाच भारतीय संघाच्या फिरकीची जबाबदारी तो पार पाडत होता. २००० च्या आसपास हरभजन सिंग भारतीय संघात दाखल झाला. एकदम जोशिला तरूण असलेला हरभजन आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवत. अधीमधी अपयशी ठरला तरी संघासाठी त्याचे योगदान अमूल्य होते. कुंबळेचा सहकारी तसेच उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. या दोघांमुळे, त्यावेळचा प्रतिभावंत फिरकीपटू मुरली कार्तिक याला कायमच मर्यादित संध्या मिळाल्या. कार्तिक हवेत चेंडू वळवण्यात तसेच फलंदाजांना चकवण्यात वाकबगार होता. पण त्याच्या आर्म बॉलमुळेच तो देशांतर्गत क्रिकेटमधील इतर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगळा भासत असे.
उच्चशिक्षितांच्या घरात जन्मलेला मुरली कार्तिक (Murali Kartik) सुद्धा शाळेमध्ये अव्वल येत. त्याला जेनेटिक इंजीनियर व्हायचे होते, सोबतच क्रिकेटची सुद्धा आवड होती. क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असेल तर इंजीनियरिंग सोड, असा सल्ला खुद्द वडिलांनी त्याला दिला व त्याने वाणिज्य शाखेकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीला, वेगवान गोलंदाज बनण्याची इच्छा असलेला कार्तिक उंचीने तितकासा नसल्याने फिरकी गोलंदाजी करू लागला. डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी करत तो चेंडू चांगलाच वळवत. तमिळनाडूच्या स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून देखील त्याची निवड राज्य संघात होत नव्हती म्हणून त्याने, १९९१ मध्ये दिल्लीची वाट धरली. दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर, बिशनसिंग बेदी, मनिंदर सिंग सारखे दिग्गज फिरकीपटू अकादमी चालवत. त्यांनी कार्तिकमधील प्रतिभा ओळखत त्याला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्याच्या गोलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा झाल्याने त्याचा समावेश १९९२ मध्ये दिल्लीच्या सोळा वर्षाखालील संघात केला गेला.
सोळा वर्षाखालील वयोगट स्पर्धांत चांगली कामगिरी केली मात्र वय वाढल्याने तो जास्त स्पर्धा खेळू शकला नाही. तसेच, दिल्लीच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात त्याची निवड झाली नाही. त्याने दिल्ली संघाला रामराम ठोकत रेल्वेची वाट धरली. १९९४-९५ च्या हंगामासाठी वर्षाखालील रेल्वेच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात त्याला स्थान मिळाले. अवघ्या पाच सामन्यात २४ बळी मिळवत त्याने मध्य विभागाच्या संघात आपली जागा पक्की केली. दमदार कामगिरीच्या जोरावर लवकरच तो भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा सदस्य झाला. १९९६-९७ रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वे संघात स्थान मिळाल्यावर दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेत त्याने आपली निवड सार्थ केली.
रणजी करंडकाचा १९९८-९९ चा हंगाम कार्तिकसाठी लाभदायक ठरला. ७ सामन्यांत २९ बळी मिळवत त्याने दुलीप करंडकासाठी मध्य विभागाच्या संघात स्थान मिळवले. पश्चिम विभागाविरुद्ध अंतिम फेरीत ७ बळी मिळवत मध्य विभागाला दुलीप करंडक जिंकून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या कार्तिकची १९९९-२००० मध्ये विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघामध्ये निवड झाली. या दौऱ्यामध्ये कार्तिकने १८ बळी मिळवले. या कामगिरीमुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी प्रथम अध्यक्षीय संघात आणि नंतर भारतीय संघात निवड झाली. पदार्पणाच्या कसोटी सामन्याची गोष्ट सांगताना कार्तिक म्हणतो,
” द. आफ्रिकेविरुद्ध मी पदार्पण करणार आहे हे समजल्यावर, मला आनंद होण्यापेक्षा काहीसे दुःख झाले. कारण त्यावेळी माझ्याकडे चांगले शूज नव्हते. मी संघात नवीन असल्याने वरिष्ठ खेळाडूंशी तितकासा बोलत नव्हतो. तेव्हा संजय बांगरने मला विचारले की, कार्तिक कशाचे टेन्शन आहे. तेव्हा मी त्याला परिस्थिती सांगितली. त्याने मोठ्या मनाने मला त्याचे शूज दिले.”
आपल्या गोलंदाजी सोबतच कार्तिक त्याच्या स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध झाला होता. गळ्यात एका विशिष्ट प्रकारचा हार तो घालत. जो त्याच्या पत्नीने त्याला भेट दिला होता. यासोबतच, गोलंदाजी करत असताना, डोळ्यांवर गॉगल घालण्याची पद्धत कार्तिकनेच सुरू केली. त्याच्याजवळ १०० हून अधिक गॉगल होते. त्याच्या गॉगल घालण्याच्या सवयीमुळे ‘ ओकले ‘ या प्रसिद्ध कंपनीने त्याला प्रायोजकत्व देण्यास सुरुवात केली.
कार्तिक राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त तब्बल ९ प्रथमश्रेणी व व्यावसायिक संघांसाठी खेळला आहे. यात रेल्वे, मिडलसेक्स, सॉमरसेट, लँकेशायर, सरे, कोलकत्ता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचा समावेश होतो.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान तो अनेकदा वादात राहिला. त्याने दोन वेळा फलंदाजांना मंकडींग केले. सरेकडून खेळताना एका सामन्यात सॉमरसेटच्या ऍलेक्स बॅरोला मंकडींगद्वारा बाद करत त्याने वाद ओढवून घेतला. पुढील वर्षी रणजी क्रिकेटमध्येदेखील बंगालच्या एका फलंदाजाला त्याने असेच बाद केल्याने त्याच्यावर बरीच टीका झाली होती. आजही, कार्तिक जाहीररीत्या मंकडींगचे समर्थन करताना दिसून येतो.
कार्तिकने भारतासाठी ८ कसोटी सामन्यांत २४ तर ३७ एकदिवसीय सामन्यांत ३७ बळी मिळवले. त्याची आंतरराष्ट्रीय आकडेवारी तितकीशी प्रभावी नसली तरी, २०३ प्रथमश्रेणी सामन्यातील ६४४ बळीं व ४४२३ धावा त्याच्या अष्टपैलूत्वाचे दाखले देतात.
अफाट क्षमता असूनही कर्णधाराच्या विश्वासास पात्र न ठरल्याने, दोन दिग्गज फिरकी गोलंदाजांच्या बरोबरीने क्रिकेट कारकीर्दीत स्पर्धा झाल्याने कार्तिक कायमच एक पर्यायी गोलंदाज म्हणून ओळखला गेला.
सध्या कार्तिक स्टार स्पोर्ट व तसेच इतर वृत्तवाहिन्यांसाठी समालोचन करताना दिसून येतो. समालोचन करतानाही आपल्या स्वभावाप्रमाणे तो अत्यंत परखडपणे टिप्पण्या करत असतो. आयपीएलदरम्यान त्याच्या समालोचनाची मेजवानी क्रिकेटरसिकांना उपभोगायला मिळत असते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा-
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार