जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ओळख मिळवलेले अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. नुकतेच या स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील २ कसोटी सामने पार पडले. तसेच आता टी२० मालिकाही याच स्टेडियमवर होणार आहे. एवढेच नाही तर याच स्टेडियमवर आयपीएल २०२१ हंगामाचे प्लेऑफचे सामने होणार आहे. तर आता अशीही चर्चा होत आहे, की यावर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातील काही महत्त्वाचे सामने देखील याच मैदानात होतील.
बीसीसीआय अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या ६ शहरात यावर्षीचा आयपीएल हंगाम ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान खेळवणार आहे. हा हंगाम टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या कोरोनाचा धोका असताना भारतात मोठी स्पर्धा आयोजित करताना कोणती समस्या तर येणार नाही ना, हे यातून कळेल. त्यामुळे यावर्षीचा टी२० विश्वचषक भारतात आयोजित करण्यासाठी त्याबद्दल तयारीही करता येईल.
तसेच ‘द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय आयपीएलसाठी निवडण्यात आलेल्या ६ शहरातच टी२० विश्वचषक स्पर्धाही आयोजिक करण्याची शक्यता आहे. खरंतर १६ संघात होणारा टी२० विश्वचषक ८ शहरात खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस होता. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता ६ शहरांतच ही स्पर्धा खेळवली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोहाली आणि धरमशाला या ठिकाणांचा टी२० विश्वचषकाच्या आयोजनातून पत्ता कट होऊ शकतो.
साधारणत: आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेच्या ६ महिनेआधी स्पर्धा कोणकोणत्या स्टेडियमवर आयोजित होणार हे जाहीर करावे लागते. मात्र, सध्याचा कोरोनाची धोका पाहाता, स्पर्धेच्या ठिकाणांबद्दल उशीरा घोषणा होऊ शकते.
टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने चेन्नई आणि बंगळुरुला आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होऊ शकतो.
टी२० विश्वचषक यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी २०१६ साली भारताने टी२० विश्वचषकाचे आयोजन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आता एकच लक्ष्य! इंग्लंडला लोळवत टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान गाठणे, पराक्रमासाठी टीम इंडिया सज्ज
“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर