न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने नावावर केली. भारतीय संघाने या विजयासह टी२० विश्वचषकातील पराभवाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७३ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या. यामध्ये भारतीय सलामीवीरांनी महत्वाचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली.
प्रत्त्युत्तरात न्यूझीलंड संघ १११ धावांपर्यंत पोहचू शकला. अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे एकंदरीत प्रदर्शन खूपच चांगले राहिले आहे. यामध्ये भारतीय संघाचे सलामीवीर, गोलंदाज, नवीन कर्णधार, तसेच युवा खेळाडूंचा महत्वाचा वाटा आहे. आपण या लेखात अशा पाच महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत, ज्यामुळे संघाला या टी२० मालिकेत विजय मिळाला.
१. भारतीय संघाने या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. यापूर्वी भारताने टी२० विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केली होती, पण संघाला अपेक्षित धावसंख्या करता आली नव्हती. संघ यावेळी मोठी धावसंख्या करू शकला नसल्यामुळे गोलंदाजांवरचा दबाव वाढला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यात तसे दिसले नाही आणि संघाने विजय मिळवला.
२. टी२० विश्वचषकातील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण पहिल्या दोन सामन्यात त्यांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीरांनी अप्रतिम प्रदर्शन केले. पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहूलच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली होती. तर तिसऱ्या सामन्यात राहुलच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनने देखील रोहितची चांगल्या प्रकारे साथ दिली. रोहित शर्माला त्याच्या महत्वाच्या योगदानासाठी मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
३. टी२० विश्वचषक आणि नुकतीच पार पडेलेल्या टी२० मालिका यामध्ये नाणेफेक महत्वाची ठरली आहे. टी२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात नाणेफेक गमावली आणि संघ दबावात आला. परिणामी, संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आणि सामनेही जिंकले. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि शेवटच्या सामन्यात संघाने प्रथम फलंदाजी केली.
४. न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली. यामध्ये वेंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या दोघांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आणि संघासाठी महत्वाची कामगिरी केली. हर्षलने दुसऱ्या सामन्याला सामनावीर पुरस्कार मिळवला. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या या दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर वेंकटेश अय्यरने शेवटच्या सामन्यात २० धावा केल्या आणि एक विकेट देखील मिळवली.
५. भारतीय संघाला या टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या रूपात नवीन पूर्णवेळ टी२० कर्णधार मिळाला. असे असले तरी, कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याच्या फलंदाजीवर कसलाच परिणाम झालेला दिसला नाही. त्याने पहिल्या सामन्यात ४८ धावा केल्या, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने सामन्यादरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले, ज्याने अनेकांना प्रभावित केले. तत्पूर्वी, रोहितने मुंबई इंडीयंसचे नेतृत्व करताना पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार
रोहितची टॉस जिंकण्याची हॅट्रिक अन् नेटकऱ्यांनी विराटवर साधला निशाणा, भन्नाट मीम्स व्हायरल