अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दुबईत खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 बाद 347 धावांचा भक्कम डोंगर उभारला. पाकिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर समीर मिन्हास. त्याने अवघ्या 113 चेंडूंमध्ये 172 धावांची जबरदस्त खेळी साकारत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याला अहमद हुसैनची चांगली साथ लाभली. अहमदने 56 धावांची उपयुक्त खेळी केली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सुरुवातीच्या काही षटकांतच भारताचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. संपूर्ण भारतीय संघ केवळ 26.2 षटकांत 156 धावांवर गारद झाला. भारताकडून दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक 36 धावा केल्या, तर वैभव सूर्यवंशीने 26 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
या सामन्यात फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. सेमीफायनलपर्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात आपला तोच फॉर्म कायम राखता आला नाही. दुसरीकडे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजीची कणा मोडली.
भारताची प्लेइंग XI आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती, मात्र दबावाच्या सामन्यात संघ अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. या पराभवासह भारताचे आशिया कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले, तर पाकिस्तानने दमदार कामगिरीच्या जोरावर अंडर-19 आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावले.
दोन्ही संघाच्या प्लेइंग XI:
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हेनिल पटेल, खिलान पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह
समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान यूसुफ (कर्णधार), हमजा जहूर (यष्टीरक्षक), हुजैफा अहसन, नकाब शफीक, मोहम्मद शायान, अली रजा, अब्दुल सुभान, मोहम्मद सय्याम






