आयपीएलमध्ये कोलकाता संघाला आणखी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे संघाला अधिक त्रास होईल कारण तो त्याच्या घरच्या मैदानावर, म्हणजे कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झाला होता. संघाला दोन गुण मिळवण्याची संधी होती, पण गुजरातने त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. संघाच्या पराभवासाठी जर कोणी थेट जबाबदार असेल तर तो वेंकटेश अय्यर आहे, जो टी- 20 मध्येही कसोटीसारखी खेळी खेळताना दिसला. तो सध्या आऊट ऑफ फाॅर्म आहे. संघाने लिलावात त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
गुजरात विरुद्ध सामन्यात कोलकाता संघाला विजयासाठी 199 धावांचे आव्हान होते. हे लक्ष्य जरी मोठे वाटत असले तरी टी-20 क्रिकेटच्या निकषांनुसार नक्कीच पार करता येण्याजोगे होते. मात्र, कोलकाताच्या डावाची सुरुवातच खराब झाली. मोहम्मद सिराजने रहमानुल्लाह गुरबाजला केवळ 1 धावांवर बाद करून मोठा धक्का दिला.
कर्णधार अजिंक्य रहाणेने झपाट्याने धावा करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूने सुनील नारायणनेही फटकेबाजी केली, पण तो फक्त 17 धावांवर माघारी परतला. अशा स्थितीत कोलकाताने आपला सर्वात महागडा खेळाडू, व्यंकटेश अय्यरला चौथ्या क्रमांकावर पाठवले.
मात्र, अय्यरची खेळी पूर्णपणे अपेक्षाभंग करणारी ठरली. त्याने 18 चेंडूंमध्ये केवळ 14 धावा केल्या, त्यात एकही चौकार किंवा षटकार नव्हता. त्याचा स्ट्राइक रेट अत्यंत कमी होता. त्याची खेळी संघावर दबाव टाकणारी ठरली. अखेर त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. 23.75 कोटी रुपये खर्च करून घेतलेल्या अय्यरकडून संघाला सातत्याने प्रभावी कामगिरीची अपेक्षा होती. पण यंदाच्या हंगामात त्याचा फॉर्म चढ-उताराचा आहे. काही सामने वगळता त्याने निराशा केली आहे.
सामन्यात जर अय्यरने आक्रमक आणि जबाबदारीची खेळी केली असती, तर कोलकाताचा संघ कदाचित विजयाच्या जवळ पोहोचू शकला असता. मात्र, त्याच्या संथ खेळीमुळे सामन्याचा प्रवाह गुजरातच्या बाजूने वळला.






