भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी (१६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी मुंबईतून रवाना व्हायचे आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची परखड उत्तरे दिली आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळात होत असलेल्या विविध विषयांवरही त्याने भाष्य केले आहे.
या दौऱ्यापूर्वी विराटला वनडे कर्णधारपदावरुन काढून रोहित शर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबद्दलही विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर आगमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आव्हानांबद्दलही त्याने भाष्य केले. या लेखात आपण विराटने पत्रकार परिषदेत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले यावर नजर टाकू.
१. विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा
मागील काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत खेळणार नाही. मात्र, आता या चर्चांना विराटनेच पूर्णविराम लावला आहे. त्याने स्पष्ट केले आहे की तो वनडे मालिकेत खेळणार आहे.
विराट म्हणाला, ‘मी उपलब्ध आहे. मला हे असे प्रश्न विचारू नका. मी नेहमीच उपलब्ध असतो. मागील काही दिवसात ज्या गोष्टी समोर आल्या, त्या सगळ्या चूकीच्या आहेत. जे लोक या गोष्टी लिहित आहेत, त्यांचे स्त्रोत योग्य नाहीत. विश्रांतीबद्दलच्या विषयावर माझे बीसीसीआयशी कोणतेही बोलणे झालेले नाही.’
२. वनडे कर्णधारपदावरुन हटवण्याबद्दल कल्पना नव्हती- विराट
वनडे कर्णधारपदावरुन काढल्याबद्दल विराट म्हणाला, ‘मला कसोटी संघाची निवड होण्याच्या दीडतासापूर्वी संपर्क करण्यात आला. माझ्याशी मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघाबद्दल चर्चा केली. त्यावेळी, मला शेवटी सांगितले की मी वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे आणि मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण, या निर्णयाबद्दल माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.’
याशिवाय जेव्हा विराटला बीसीसीआयने हा निर्णय का घेतला असे विचारले असता, तो म्हणाला, ‘कारण? नक्कीच आपण कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेलो नाही. मला त्यांनी हा निर्णय का घेतला, यामागील तर्क मी समजू शकतो.’
३. गांगुलीच्या मुद्याशी विरोधाभास
काहीदिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, विराटला बीसीसीआयकडून विनंती करण्यात आली होती की, त्याने टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडू नये. मात्र, विराटने टी२० संघाचे नेतृत्त्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आता विराटने याबद्दल भाष्य केले आहे की, ‘मी जेव्हा बीसीसीआयला टी२० कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितले होते, तेव्हा त्याचा खूप चांगल्याप्रकारे स्वीकार करण्यात आला होता. त्यात कुठल्याच प्रकारचा संकोच नव्हता. हे खूप प्रगतीशील पाऊल होते. त्यावेळी मी सांगितले होते, की मी वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. माझ्याकडून संवाद खूप स्पष्ट होता. तसेच मला कोणीही टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले नव्हते. पण, त्याचवेळी मी हे देखील स्पष्ट केले होते की, जर अधिकाऱ्यांना आणि निवडकर्त्यांना वाटत असेल की मी बाकी प्रकारात नेतृत्त्व करू नये, तर माझी काही तक्रार नव्हती.’
४. रोहित बरोबरचे संबंध
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माबरोबर कोणतेही वाद नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. तसेच त्याने रोहितच्या कर्णधारपदाबद्दलही आपली मतं व्यक्त केली आहेत.
विराट म्हणाला, ‘रोहित हा एक सक्षम कर्णधार आहे आणि आपण ते आयपीएलमध्ये, तसेच त्याने भारतासाठी नेतृत्त्व करताना पाहिले आहे. राहुल द्रविडची भूमीकाही खूप महत्त्वाची आहे. त्या दोघांनाही माझे पूर्ण सहकार्य असेल. माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतेही वाद नाही. मी मागील अडीच वर्षापासून या गोष्टीचे स्पष्टीकरण देत आहे. मी आता हे सांगून थकलो आहे.’
५. संघातील भूमीकेबद्दलही मांडले मत
विराट त्याच्या संघातील भूमीकेबद्दल म्हणाला, ‘मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. संघासाठी कामगिरी करण्याची माझी इच्छा कधीही कमी होणार नाही. मी कर्णधार असतानाही जबाबदारीने खेळलो, यापुढेही मी प्रामाणिक असेल.’
त्याचबरोबर तो म्हणाला, ‘जेव्हा तूम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षे खेळता, तेव्हा तुम्हाला माहित असते की, कसा खेळ करायचा. भारताकडून खेळण्यासाठी मला प्रेरित होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही’
याशिवाय विराटने असेही म्हटले की, ‘बाहेर अनेक गोष्टींबद्दल बोलले जाते, जे योग्य नाही. पण त्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. मी मानसिकरित्या तयार आहे आणि दक्षिण आफ्रिकेच चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’
६. दक्षिण आफ्रिका वेगळे आव्हान
दक्षिण आफ्रिदा दौऱ्यातील आव्हानाबद्दल विराट म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिका हा त्या प्रवासाची सुरुवात आहे, जेव्हा आम्हाला विश्वास मिळाला की, आम्ही कुठेही जिंकू शकतो. दक्षिण आफ्रिकेत वेगळे आव्हान असते. चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागते. अनुभवाने तुम्ही कठीण परिस्थितीही हाताळू शकता. यावेळीही आम्ही काहीतरी विशेष करू.’
तसेच विराट कोहली म्हणाला, ‘आम्ही नक्कीच कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत. दक्षिण आफ्रिका हे एक ठिकाण आहे, जिथे आम्ही कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आम्ही नक्कीच आमचे सर्वोत्तम देऊ.’
महत्त्वाच्या बातम्या –
ऍडीलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन जाहीर; मात्र, प्रमुख गोलंदाज संघाबाहेर