यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2025) आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने 10 डावांमध्ये 443 धावा केल्या आहेत. त्याची दमदार कामगिरी पाहून भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना म्हणाला होता की, कोहलीला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घाई होती. कोहली आणखी 2 वर्षे या फॉरमॅटमध्ये खेळू शकला असता असे त्याला वाटले. पण आता विराटने स्वतः स्पष्ट केले आहे की 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय का घेतला?
वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनल सामन्यात कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. दरम्यान भारताने हा रोमांचक सामना फक्त 7 धावांनी जिंकला.
सामन्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आता स्टार फलंदाज विराट कोहली या निर्णयामागील खरे कारण काय होते हे सांगितले आहे. आरसीबी पॉडकास्टमध्ये, विराट म्हणाला की, त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला कारण तो पुढील टी20 विश्वचषकापूर्वी नवीन खेळाडूंना 2 वर्षे देऊ इच्छित होता.
विराट कोहली म्हणाला, “मला वाटत नाही की माझ्यासाठी परिस्थिती कोणत्याही प्रकारे बदलली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे विचारात घेतला गेला की नवीन खेळाडूंचा समूह तयार आहे आणि पूर्णपणे तयार आहे परंतु त्यांना वेळेची आवश्यकता आहे. त्यांना 2 वर्षांचा टप्पा हवा आहे ज्यामध्ये ते भरभराट करू शकतील, दबाव हाताळायला शिकतील. जगाच्या वेगवेगळ्या भागात खेळा आणि इतके सामने खेळा की जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा त्यांना असे वाटेल की ते पूर्णपणे तयार आहेत.”
विराट कोहलीच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, कोहलीने 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 4,188 धावा केल्या. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 48.69 होती. तसेच या फाॅरमॅटमध्ये त्याने 38 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. टी20 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 आहे.






