रांची। भारताने मंगळवारी(22 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी विराटने सौरव गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर विराटला पत्रकार परिषदेत गांगुलीशी एमएस धोनीच्या भविष्याबाबत काही चर्चा झाली का असे विचारण्यात आले होते.
यावर उत्तर देताना विराट म्हणाला, ‘मी गांगुलीला शुभेच्छा दिल्या. तो बीसीसीआयचे अध्यक्ष बनले हे खूप छान झाले. परंतु, त्यानी आतापर्यंत धोनीबद्दल माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. जेव्हा त्यांना चर्चा करायची असेल तेव्हा ते संपर्क साधतील. मला ज्यावेळी सांगितलं जाईल त्यावेळी मी त्यांना भेटायला जाईल.’
तसेच मागील आठवड्यात गांगुली म्हणाला होता की तो 24 ऑक्टोबरला निवड समीतीला आणि विराटला भेटेल. त्यावेळी धोनीच्या भविष्याबाबतही चर्चा करेल. 24 ऑक्टोबरला पुढील महिन्यात बांग्लादेशाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचीही निवड होणार आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश संघात नोव्हेंबरमध्ये 3 टी20 सामन्यांची आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील टी20 मालिकेत धोनी खेळणार का की या मालिकेतूनही तो विश्रांती घेणार आहे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धोनीने याआधी वेस्ट इंडीज दौऱ्यातून तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती.
धोनी भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात जूलैमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात खेळला होता.






