ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला. नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने अशक्यप्राय वाटणारा विजय भारताच्या पारड्यात टाकला. सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत बोलताना विराटने या सामन्यातील टर्निंग पॉईंट कोणता होता याचा खुलासा केला.
केएल राहुलच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसल्यानंतर विराट फलंदाजासाठी मैदानात उतरला. तो मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले. त्यानंतर त्याने अष्टपैलू हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या ऐतिहासिक विजयानंतर मुलाखतीत इरफान पठाण व जतिन सप्रू यांच्याशी बोलताना विराटने सामन्यातील अनेक घटनांचा उलगडा केला. या सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता ठरला याबाबत बोलताना विराट म्हणाला,
“हार्दिक आणि मी मेहनतीने सामना शेवटपर्यंत घेऊन चाललो होतो. मात्र, एक वेळ अशी आली की आम्हाला जिंकण्यासाठी 8 चेंडूवर 28 धावांची गरज होती. त्यावेळी दोन षटकार कोणत्याही परिस्थितीत मारणे गरजेचे होतेच. तेव्हा मी स्ट्राइकला असल्याने ती जबाबदारी माझ्यावर आली. सुदैवाने रऊफचे ते दोन्ही चेंडू चांगले बॅटवर आले आणि दोन षटकार वसूल केले गेले. ते दोन षटकार आले नसते तर आपण सामना गमावला असता.”
भारताने या विजयासह मागील विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल