गेल्या काही दिवसात भारतीय संघात अनेक मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. परंतु, या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ज्यावेळी कसोटी संघाची घोषणा करण्यात आली होती, त्याचवेळी विराट कोहलीला काढून रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. या प्रकरणात सौरव गांगुलीने म्हटले होते की, मी विराटला कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती.
परंतु, विराट कोहलीने पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की, त्याला कर्णधारपदावरून काढण्याच्या दिड तासांपूर्वी हा निर्णय सांगण्यात आला होता. आता या कारणामुळे विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आमनेसामने आले आहेत. दरम्यान विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी म्हटले की, “जे काही झालं ते आश्चर्यचकित करणार आहे. यावर आता मी काय बोलू? हे जे काही झालं ते नको व्हायला होतं. मी याबाबत जास्त काही बोलणार नाही. मला इतकच म्हणायचं आहे की, बोर्डकडे हक्क आहेत. त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे. तो विचार करूनच घेतला असेल. जे झालं ते योग्य होतं की चुकीचं होतं, यावर मी बोलणं व्यर्थ आहे.”
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणात सौरव गांगुली यांचे म्हणणे होते की, त्यांनी विराट कोहलीला कॉल करून टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती. परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने म्हटले की, ” ८ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली होती. ही बैठक होण्याच्या दीड तासांपूर्वी मला संपर्क करण्यात आला होता. त्यावेळी मला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची माहिती देण्यात आली होती. टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर मला कोणी ही संपर्क केला नव्हता.”
महत्वाच्या बातम्या :
Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…
‘…तर सरळ कर्णधारालाच बॅन करा’; दिग्गजाने केली आगळीवेगळी मागणी
पठ्ठ्याने चक्क पंचांनाच दिली जीवे मारण्याची धमकी; आता भोगतोय परिणाम