भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी (६ फेब्रुवारी) भारताने जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताचा गोलंदाज वाॅशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने ३० धावा देत ३ विकेट घेतल्या. तो मागील ५ महिन्यांमध्ये त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दुर होता. तो काळ त्याच्यासाठी कष्टांचा होता. यावर आता त्याने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो म्हणाला की त्याने या मोठ्या ब्रेकचा उपयोग खेळाडू म्हणून स्वतःला विकसित करण्यासाठी केला.
वॉशिंग्टन सुंदर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, “आव्हाने खूप होती, पण माझ्या हातात जे होते, ते मी करू शकत होतो. मला एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून चांगले व्हायचे होते. गेल्या दोन वर्षांमध्ये मला हे समजले आहे की, खेळाच्या मार्गात अनेक अडचणी येतील, पण त्यांचा सामना करुन आपल्याला पूढे जावे लागेल”.
सुंदरला टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर त्याला कोरोना संसर्गामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही जाता आले नाही. तो म्हणाला, “मला गेल्या दोन वर्षांत समजले आहे की, आव्हाने सतत असतील. पण मला त्यांचा सामना करायला शिकावे लागेल. या वर्षाच्या शेवटी टी२० विश्वचषक आणि पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार असल्यामुळे माझे लक्ष्य या दोन्हीवर असेल. विश्वचषक खेळण्याची संधी गमावणे खूप निराशाजनक होते. परंतु, पुढच्या १५-१६ महिन्यांमध्ये दोन विश्वचषक आहेत, त्यामुळे माझे लक्ष त्याच्याकडेच आहे.”
पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “विजय हजारे ट्रॉफीमध्ये पॉवरप्ले षटकामध्ये केलेल्या गोलंदाजीचा त्याला फायदा झाला. मी गेल्या काही वर्षांपासून हे करत आहे. आता नवीन चेंडूने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यात मजा येत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेने मला वेगवेगळ्या परिस्थितीत गोलंदाजी करण्यास मदत केली.”
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६ विकेटने पराभव केला. पहिल्यांदा खेळत वेस्ट इंडिज संघाने १७६ धावा केल्या आणि सर्वबाद झाला. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २८ षटकांत ४ बाद १७८ धावा करून सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. आता दुसरा सामना ९, तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गांगुलीच्या इच्छेला हार्दिककडून बगल? रणजी स्पर्धेबाबत घेतला मोठा निर्णय
“मी त्यांना लताजी म्हटले, तर त्यांनी मला ‘आई’…” शोएब अख्तरने दिली भावनिक श्रद्धांजली
एशियन गेम्समधील २ वेळचे सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार यांचे निधन; महाभारतात साकारलेला ‘भीम’