उत्कंठा, रोमांच, उत्साह फक्त मर्यादित षटकाच्या सामन्यात असतो; कसोटीत असे उत्कंठवर्धक सामने होत नाही हे विधान पुन्हा मोडीत निघाले आहे. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हा थरार अनुभवायला मिळाला. किंग्स्टनमधील सबिना पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हा थरार शिगेला पोहोचला होता. अखेर केवळ एका विकेटच्या फरकाने वेस्ट इंडिजने पाकिस्तानला पराभूत केले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानकडून मिळालेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने आपला 9 वा गडी 151 धावांवर गमावला. विजय अजून कॅरेबियन संघापासून 17 धावा दूर होता आणि जिंकण्यासाठी पाकिस्तानला फक्त एका विकेटची गरज होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेईल असे क्रिकेट चाहत्यांनी गृहीत धरले होते. पण, केमार रोच (नाबाद 30) आणि जेडेन सील (नाबाद 2) यांनी पुन्हा एकदा क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते, हे सिद्ध केले.
दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या विकेटसाठी 17 धावांची अभेद्य भागीदारी केली आणि रोचने हसन अलीच्या गोलंदाजीवर दोन धावा काढून वेस्ट इंडिजला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
पाकिस्तानकडून विजयासाठी मिळालेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाने कर्णधार क्रेग ब्रॅथवेटसह त्यांचे तीन फलंदाज फक्त 16 धावांमध्ये गमावले. यानंतर, ब्लॅकवुड आणि रोस्टन चेस यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची मोलाची भागीदारी केली. फहीम अशरफने ही भागीदारी तोडण्यात यश मिळवले. यानंतर, वेस्ट इंडिज संघाचा डाव आणखी गडबडत गेला आणि 150 चा आकडा पार करताना वेस्ट इंडिज संघाने आपले 9 गडी गमावले होते.
मात्र, केमार आणि सील्स यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने चार आणि हसन अलीने दुसऱ्या डावात तीन बळी घेतले.
तत्पूर्वी, कर्णधार बाबर आझमच्या 55 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 203 धावांपर्यंत मजल मारू शकला होता. याशिवाय मोहम्मद रिझवानने 33 आणि हसन अलीने 28 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी गोलंदाजीत जेडेन सील आणि केमार रोच चमकले होते. सीलने 5 आणि रोचने 3 बळी घेतले होते. पाकिस्तानने पहिल्या डावात 217 धावा केल्या होत्या, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून वेस्ट इंडिजच्या संघाने सर्वबाद 253 धावा केल्या होत्या. पहिल्या डावामुळे वेस्ट इंडिजकडे 36 धावांची आघाडी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
संघ कठीण परिस्थितीत असूनही रिषभ दिसत होता निवांत; नेटकरी म्हणाले, ‘हेच त्याच्या यशाचं गुपित’
पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याने विराट स्वत:वर नाराज, ड्रेसिंग रूममध्ये ‘अशी’ काढली भडास
तमिळनाडू प्रीमियर लीगवर ‘या’ संघाचे वर्चस्व कायम, जिंकला तिसऱ्यांदा चषक