क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. खिसा रिकामा करून प्रेक्षक सामन्यांची तिकीटे घेतात, पण अनेकदा पावसामुळे प्रेक्षकांना अर्धाच सामना पाहून समाधान मानावे लागते. असेच काहीसे आशिया चषक 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर कुठलाही सामना पावसामुळे रद्द झाला नाही. अशात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर- 4 फेरीतील सामना रविवारी (दि. 10 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोलंबो येथील हवामानाविषयी बोलायचं झालं, तर शनिवारी (दि. 09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) संघातील सामना व्यवस्थितपणे पार पडला. मात्र, रविवारी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात पावसाची शक्यता 90 टक्के आहे. दिवसाचे तापमान 29 अंश सेल्सियस आणि रात्री 25 अंश सेल्सियसच्या आसपास असू शकते. तसेच, 11 सप्टेंबर रोजीही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशात मोठा प्रश्न हा आहे की, जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर काय होईल?
दोन्ही संघांना मिळणार एक-एक गुण
भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामना पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना पुन्हा 1-1 गुण मिळेल. अशात पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. कारण, बांगलादेशवरील विजयाने त्यांच्याकडे 2 गुण आहेत आणि 1.051च्या नेट रनरेटसोबत ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. अशात संघाचे 3 गुण होतील. तसेच, भारतीय संघाला 1 गुणावर समाधान मानावे लागेल.
मात्र, यानंतरही पाकिस्तान-भारतीय संघाचे आव्हान कमी होणार नाही. भारतीय संघाला 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागेल. जर भारताने एकही सामना गमावला, तर त्यांचे अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरले जाऊ शकते.
दोन्ही संघांकडे 5 गुण मिळवण्याची संधी
दुसरीकडे, पाकिस्तान संघासाठीही आव्हान कमी नसेल. त्यांचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध 14 सप्टेंबर रोजी होईल. त्यात पाकिस्तानला विजय मिळवावा लागेल. अशाप्रकारे जर भारताने पाकिस्तानविरुद्ध 1 गुण मिळवला आणि श्रीलंका, बांगलादेश यांच्याविरुद्ध विजय मिळवला, तर भारताकडे एकूण 5 गुण होतील. तसेच, पाकिस्तान संघाकडेही श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने 5 गुण होतील. अशात अंतिम सामन्यात पोहोचण्याचे समीकरण दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक होईल. आता हा सामना पूर्ण होतो की नाही, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (what if it rains on ind vs pak reserve day know asia cup 2023 super 4 and final equation read here)
हेही वाचाच-
विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला जबरदस्त धक्का! स्टार गोलंदाज वनडे मालिकेतून बाहेर, लगेच वाचा
ऍडम झंपा ठरला स्टार! चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियासाठी जिंकला सामना, मालिकाही केली नावावर